मला सुखी माणसाचा सदरा हवा आहे. कुठे मिळेल?
– नवाब शेख, सातारा
माझ्याकडे आहे.. हवा असल्यास विकतच मिळेल. किंमत आम्ही सांगू तीच. घासाघीस होणार नाही. (विनोदाचा भाग सोडा आणि घरात शोध घ्या. असा सदरा आपल्या घरीच मिळेल.. वडिलांचा सदरा बघा. त्यांच्या घामाचा वास येत असेल तर तोच सुखी माणसाचा सदरा आहे, असं बिनदिक्कत समजा.)
केरळसारख्या राज्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन गुण्यागोविंदाने राहतात, एकमेकांना निषिद्ध असलेले पदार्थ एकमेकांशेजारी बसून खातात. कोणाच्या भावना दुखावत नाहीत त्याने. असा आपला सगळाच देश असायला पाहिजे ना?
– संतोष सामंत, ठाणे
आपला सगळा देश असाच आहे एकमेकांशेजारी बसून खाणारा… पण वाढणार्यांनाच खरकटं हवं असेल तर खाणार्याने कितीही काळजीपूर्वक खाल्लं तरी वाढणारे त्याच खरकटं करतातच आणि बिल खाणार्यांच्या नावाने फाडतातच… आता कोण खरकटं करणारे असं विचारून खरकटं करणार्यांप्रमाणे विषय भरकटवू नका.
माझे एक काका पाच पाच वाट्या आमरस पितात, तीन तीन वाट्या श्रीखंड खातात, पाचसहा पुरणपोळ्या खातात, कोणतीही पाव किलो मिठाई एकटेच फस्त करतात. पण जो भेटेल त्याला सांगतात की आपल्या आरोग्यासाठी गोड खाणं अतिशय वाईट, ते कायमचं सोडलं पाहिजे… जे इतरांना सांगायचं ते आधी आपण केलं पाहिजे ना?
– नील सायखेडकर, परभणी
अहो, इतरांनी सोडलं तरच ‘तुमच्या काकांना’ खायला मिळेल ना… तुम्ही म्हणताय तितकं खाऊनही त्यांना सगळंच खावंसं वाटत असेल. मग ते इतरांच्या ताटातलंच खाणार ना. कदाचित काकांना पुढे करून त्यांचे मित्र काकांच्या नावाने खात असतील… आणि ‘त्या मित्रांना’ जे हवंय ते खायला देणं हे आपलं कर्तव्य आहे असं काकांना वाटत असेल. आणि त्या मित्रांना हवं ते खाता यावं म्हणूनच काका इतरांना हे सोडा ते सोडा असे सांगत असतील. (आणि कुठल्या काकांबद्दल बोलताय ते स्पष्ट बोला, नाहीतर ज्या काकांबद्दल बोलताय त्यांना अस्पष्ट जरी कल्पना आली, तर तुमच्या पुतण्याला त्यांचा मित्र बनवतील आणि तुम्ही काका असून तुमचा मामा करतील.)
संतोषजी, तुम्ही तुमच्या अंगणात सिंदुराचं झाड लावलंत की नाही?
– नेहा पेंडसे, धनकवडी, पुणे
तुम्हाला सिंदुराच्या झाडाला खतपाणी घालायचंय का? या झाडाला खतपाणी घातल्यावर सरकारकडून सबसिडी मिळते का? आमच्या अंगणात आहे तेच सिंदूरचं झाड नको नको झालंय. पण आपल्या अंगणातलं झाड वार्यावर सोडायचं आणि दुसर्याच्या अंगणात जबरदस्ती लावायचं हे आम्हाला तरी जमणार नाही.
दोन भावांचं भांडण झालं की त्यांच्या मित्रांना मजा वाटते. ते दोघे गैरसमज, वादविवाद मागे ठेवून एकत्र येत असतील, तर मात्र त्याच मित्रांच्या पोटात दुखायला लागतं… असे कसे हे मित्र?
– प्रतीक सोनवणे, चेंबूर
मुळात तुम्ही म्हणताय तसे ते मित्र आहेत का? त्यांची वर्तमानातली हिस्ट्री चेक करा. स्वत:ला मित्र म्हणवून घेणं ही त्यांची एक तडजोड असेल. जसं काहीजण अमक्याबरोबर अजिबात लग्न करणार नाही असं टेलिव्हिजनवर बोंबलून बोंबलून बोलतात आणि मग त्याच अमक्याबरोबर संसार थाटतात, आणि ही एक तडजोड आहे असं त्याच टेलिव्हिजनवर, वर तोंड करून सांगतात, तसं काहीसं असावं. तुम्ही उगाच त्यांच्या तडजोडीला नावं ठेवू नका. नाहीतर सरळ नाव घेऊन नावं ठेवा. दोन भावांच्या भांडणावर ज्यांचं पोट आहे, ते पोट ते दोन भाऊ एकत्र आल्यावर दुखायला लागणारच ना… तुम्हाला त्यांच्या पोटावर पाय आणायचाय का?
बायकोबरोबर वादविवादात जिंकलेला एखादा पुरुष तुम्हाला माहिती आहे का? त्याचा शिवाजी पार्कावर जाहीर सत्कार करायचा आहे.
– नितीन पाचपुते, विद्याविहार, मुंबई
असं बोलून तुम्ही इतर पुरुषांच्या रांगेत शिरू नका… असे खूप पुरुष आम्हाला माहिती आहेत जे बायकोबरोबरच्या वादविवादात जिंकलेला मीच तो… मीच तो… असे उड्या मारत म्हणतील.. पण शिवाजी पार्कवर जाहीर सत्कार करायचा म्हटल्यावर तो मी नव्हेच म्हणून मोकळे होतील. कसंय, कोणीही पुरुष दुसर्याच्या बायकोच्या नथीतून तीर मारून आपलं प्रâस्ट्रेशन असं तुमच्यासारखं जाहीर करत नाही. असं करून आपले भोगही कमी होत नाहीत. तुमच्या प्रश्नातूनच तुमचे भोग कळले, आलिया भोगासी गपचूप भोगावे, मुखी असू द्यावे समाधान, नाही तर जे झाकायला जावं तेच उघडं पडतं.