कितव्या तरी माळ्यावरचं हवेशीर कार्यालय. स्थापना वर्षातील सुरुवातीच्या अंकातील फक्त १९ स्पष्ट दिसतायत. कार्यालय इतकं धार्मिक की बाहेर फक्त लिंबू-मिरची अथवा कोहळे भारून बांधणं बाकी आहे. आतून धूप-दीपाचा ऊग्र वास येतोय. दारात एक शिपाई मोबाईल घेऊन बसला आहे. कार्यालयाच्या नूतनीकरणात कार्यालयाचं नाव आणि नावातील अक्षरं बाधित झाली आहेत. त्यामुळे कार्यालयाचं नाव सध्या ‘माहेला आजयवर्धने योग’ असं काहीसं दिसतं आहे. पण त्याकडे कुणाचं लक्ष नाहीय. बाहेर लोखंडी बाकड्यावर स्त्रिया, महिला, मुली आपापल्या समस्या सांगण्यासाठी नंबर लावून बसल्या आहेत. त्यात आतून येणारा तुप्पोली माखनधर मॅडमचा मधूनच खळखळून हसण्याचा आवाज अवचित कधी कान हलके करून जातोय.
बाहेर बसलेला शिपाई निरनिराळे रील्स बघत मधूनच काही तालबद्ध अॅक्शन करून शूट करून पाहतो. बाहेर समस्या घेऊन आलेल्या चिंताग्रस्त बाया तो तमाशा उघड्या डोळ्यांनी बघताय. तितक्यात एक म्हातारी एक एक कार्यालय न्याहाळत तिथं येते.
‘बया, ह्या भवान्या बसल्यात कुठं? इथं जे ते हाफीस फक्त रंगवलीत एकसारखी. कुणी सांगना बी! अय अय पोरा! त्या बाया कुठं बसल्यात रे?’ म्हातारी शिपायाला विचारते. पण कानात इअर बड्स घातलेल्या शिपायाच्या कानापर्यंत काहीही आवाज पोहोचत नाही. तो त्याच्या रील्स बघण्याच्या उद्योगात गर्क आहे.
‘बया ह्याला बी मोबाईलनं झपाटलंय तर्… याच्यासाठी एखादं मिरची हवन घातलं पाहिजे खरंतर… अय पोरा! ऐकू येतं का? बोळे काढ कानातले! बोळे!’ म्हातारी मोठ्याने आवाज देते.
‘अँ? काय?’ शिपाई कानातले बोळे काढत त्रासिक चेहर्याने प्रश्न विचारतो.
‘इथं कुठं त्या नटव्या बसत्या रे?’ म्हातारी जरा चिडून विचारते.
‘काय काम होतं तुमचं?’ शिपाई प्रतिप्रश्न करतो.
‘माझं मेलीचं कुठं काय काम असणार आहे? माझ्या अर्ध्या गवर्या गेल्या म्हसणात. हे नातीचं सासर जरा बारा —चं निघालं. त्यांच्याविरुद्ध पोलिसात अर्जी दिली. तिथं त्या बाबानं सांगितलं का म्हम्हईत जा. तिथं काही बाया बायांच्या तक्रारी ऐकून झटकन कारवाई करतात. म्हणून आले बाबा इथं. पण त्या साळकाया-माळकाया बसत्या कुठं? ते माहीत नाही. म्हणून शोधीत आले बाबा! तुला माहीत असंल तं सांग बाबा. मेले अर्धा तास फिरू-फिरू गुडघे दुखाया लागले बघ!’ म्हातारी त्याला सविस्तरपणे सांगते.
‘बरोबर आल्यात तुम्ही! हे इथं या बायांशेजारी बसा! नंबर लावून!’ शिपाई बाकड्याकडे बोट दाखवून सांगतो.
‘पण किती येळ बसायचं? अर्ध्याएक घंट्यात रिटर्नची बस व्हती. आमचं गार्हाणं लवकर ऐकलं असतं म्हणजे निघायला मोकळे झाले असतो आम्ही!’
‘आज्जी, इथं आधीच एक रांग झालीय. ती सोडून तुमचा नंबर कसा लवकर लागंल?’ शिपाई पुन्हा मोबाईलमध्ये बघू लागतो.
‘मग रे बाबा? कधी लागंल नंबर? कुणी आत जाताना बी दिसंना इथून,’ म्हातारी डोईवरचा पदर सावरत विचारते.
‘हे बघा! इथं वेळापत्रकानुसार कामं होतात. ते होतील,’ शिपाई बडबडतो.
‘पण आम्ही सकाळपासून इथं बाहेर आहोत. रजिस्टरमध्ये नोंद करून सुद्धा अजून बोलावलं नाहीय. आत कोण आहे तेही कळेना. फक्त आवाज तेवढे येताय. नेमका तक्रार निवारणाचा वेळ कुठलाय हे तरी सांगा,’ एक महिला तक्रारीचा सूर लावते.
‘हे बघा, कार्यालयीन वेळ ११ ते २ आणि २.३० ते ५ अशी आहे,’ शिपाई महिलांना समजावतो.
‘वेळ सगळ्यांना माहितेय. पण तुझी बाई काम करती कधी?’ म्हातारी खोचकपणे विचारते.
‘हे बघा आज्जी, त्यांना खूप काम असतं. तक्रारी ऐकणं, सुनावणी घेणं. पक्षकारांना नोटिसा काढणं. एखाद्या पक्षाचं समुपदेशन करणं. वेळप्रसंगी पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश देणं. संबंधित प्रकरणांचा योग्य त्या आणि आवश्यक त्या ठिकाणी पाठपुरावा करणं. सरकार दरबारी महिलांची बाजू मांडणं. अशी असंख्य कामं असतात,’ शिपाई कामांचा पाढा वाचतो.
‘मग आता यांपैकी कुठलं काम तुही बाई करू राह्यली?’ म्हातारी थेट प्रश्न करते.
‘त्या आता समाजप्रबोधनाचं आणि आयोगाच्या प्रसिद्धीचं मोठं काम करताय,’ शिपाई कवतीकाने सांगतो.
‘हा पण कुठलं? जरा आम्हाला बी कळू दे!’ म्हातारी खोदू खोदू विचारते.
‘त्या त्यांचं, पक्षाचं आणि दादासाहेबांचं काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कायम झटत असतात. तेही असं की हे जनसंपर्काचं काम सरकारचा एकही रुपया खर्ची न घालता त्या करतात…’ शिपाई रंगवून सांगू लागतो.
‘कसं ते सांग बाबा! उगा का लाम्हण लावतोय? आवर!’ म्हातारी कासरा वढते.
‘त्या रील्स करतात. आणि फेबु इंस्टावर अपलोड करतात. रोज नव्या साडीत, नव्या ढंगात, नव्या गाण्यात त्यांचे प्रबोधनात्मक, समाजाला दिशादर्शक असे त्यांचे रील्स अपलोड होतात. ते शेकडो लोकं बघतात. त्यांच्या कार्याने प्रेरित होतात आणि कमेंटीत एकमेकांच्या आई-बहिणीची ख्यालीखुशाली विचारून सभ्यता पाळतात,’ शिपाई तोंडभरून सांगतो.
‘पण आता त्या भेटतील कवा?’ म्हातारी शिपायाला मुद्द्यावर आणते.
‘हे बघा अकरा ते बारा त्या स्वतः निरनिराळ्या रील्सचा अभ्यास करतात. पुढे बारा ते एकमध्ये आज ह्या घडीचा महत्त्वाचा विषय निवडून एक ते दोनच्या दरम्यान त्या विषयावर रील्स शूट करण्यापूर्वीची आवश्यक ती पूर्वतयारी त्या करतात. मग अडीच ते साडेतीन दरम्यान त्याचं शूट होतं. साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान त्याचं एडिटिंग होतं. मग पब्लिक वायफायमध्ये साडेचार ते पाच दरम्यान अप्लोडिंग करवलं जातं. असा त्यांचा एकूण दिनक्रम आहे,’ शिपाई निरलसपणे सगळं समजावून सांगतो.
‘हाय देवा! मग तुही बाई भेटते कधी रे? तक्रारी बघते कधी रे?’ म्हातारी कळीचा प्रश्न विचारते.
‘फावल्या वेळेत त्या तक्रारी बघतात. त्यावर नियमानुसार कार्यवाही करतात,’ शिपाई अगदी सहज बोलतो.
‘पण आता ह्या एवढ्या जणी जमल्यात इथं. मग इथं एकएकीची तक्रार ऐकायची म्हंटलं, तर रात्र होईल,’ म्हातारी चिंता व्यक्त करते.
‘त्याचं टेन्शन घेऊ नका. आजच्या रील्ससाठी गाणं सुचवायची पाळी माझी आहे. ते एकदा मला सापडलं की पाच मिनिटांत सगळ्यांना मोकळं करतो. त्याला फार वेळ लागणार नाही, बरं का?’ शिपाई सगळ्यांना आश्वासित करतो.
‘अशी करणार काय आहे तू जादू? पाच मिनिटांत सगळ्यांच्या समस्या सोडवायला?’ म्हातारीला प्रश्न पडतो, तो ती विचारते.
‘त्याला कश्याला पाहिजे जादू? एक एक तक्रार अर्ज, जो तुम्ही लिहून सोबत आणलाय. तो असा घ्यायचा. भरभर त्याच्यावरून नजर फिरवायची. जो सरकार पक्षातल्या व्यक्तींच्या विरोधात असेल. तो सरळ कचर्याच्या डब्यात टाकायचा. जो पक्ष वा नातेवाईक, मित्रपरिवाराविरुद्ध असेल तो बुडाखाली दाबून ठेवायचा. जपून ठेवायचा. आणि बाकी माणसं साधी, दखल देण्याजोगी नसेल, म्हणजे थोडक्यात ज्या प्रकरणाला टीआरपी नसेल, ते तक्रार अर्ज कुठंही धूळखात पडले तरी पर्वा कुणाला आहे? राहिलं अति संवेदनशील मीडिया ट्रायलचे प्रकरण! त्याविषयी दादांचा फोन येतोच येतो. मग ती कागदं असली काय आणि नसली काय… ती पैदा करून का होईना झटपट कारवाई करावीच लागते. बघा. पाच मिनिटांत सगळ्या जणींच्या समस्या सोडवल्यात की नाही मी? सगळी रांग गायब,’ शिपाई बोलता बोलता सगळे अर्ज जमा करतो. सांगितल्यानुसार वर्गवारी करतो. नि त्याचे गठ्ठे बांधून मध्ये घेऊन जातो. गेल्या पावली चटकन माघारी फिरतो आणि पुन्हा मोबाईल घेऊन बसतो.
‘पोरा एक गाणं मला बी शोध जरा,’ म्हातारी विनंतीवजा मागणं घालते.
‘का हो आज्जी? ते कश्यासाठी?’ शिपाई आश्चर्याने विचारतो.
‘मी ही एक रील बनवते की! बायांच्या अडीअडचणीसंदर्भात. दुष्काळात सात सात परस पाणी शेंदणार्या बायांपासून, ते प्रसूतीसाठी पाच-पंचवीस किलोमीटर पायी चालणार्या बायापर्यंत. सासर/माहेरच्या अत्याचार पीडितेंपासून व्यवस्थेच्या पीडितेपर्यंत. सव्वा दिवसांच्या कवळ्या मुलीपासून शंभरीच्या जख्खड म्हातारीपर्यंत. गडचिरोलीच्या दुर्गम जंगलात राहणार्या अभावग्रस्त महिलेपासून मुंबैच्या चाळीस पन्नास माळ्यावर राहणार्या सर्वसंपन्न महिलेपर्यंत. दलित, आदिवासी, मागास आणि सवर्ण अश्या सगळ्याच बाया, ज्यांना लिंगभेदाचा सामना करावा लागतो, अश्या सार्या जणींच्या समस्या रील्स बनवून टाकत जाईन मी!’ इति आज्जी!
‘अरे व्वा! भारीय की हे! फक्त एकदा मॅडमच्या रील्ससाठी गाणं शोधू द्या. मग मी तुमचं बघतो,’ शिपाई उत्साहाने बोलतो.
‘त्या मॅडमच्या रीलला हे गाणं जोड की मग, ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली!’ मुडद्या!’ म्हातारी एक सवान हातानं शिपायाच्या कानामागं टेकवते!!