• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मार्ग हा सोपा सुखरूप…

- ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर (अभंगबोध-१०)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 12, 2025
in धर्म-कर्म
0

ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर

होते बहुत दिवस आर्त वागविले।
आजि आकस्मात फळ देऊ आले।
दृष्टी देखिली श्रीहरिची पाऊले।
घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले वो ।।१।।
धन्य हे आनंदाची सापडली वेळ।
ते हे संतसज्जन भेटले कृपाळ।
त्यानी फेडियेला बुद्धीचा वो मळ।
दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ वो ।।२।।
नाना साधनाच्या केल्या खटपटा।
परि त्या न पवती याचिया दारवंटा।
जाणो जाता जाणीव घाली आडफाटा।
योगाभ्यास सिद्धी रोधिती वाटा वो ।।३।।
यज्ञ यागे स्वर्गभोग आड येती।
करिता तपे कामक्रोध खवळती।
नित्या नित्ये ज्ञाने अभिमान वाढती।
करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती वो ।।४।।
जपता मंत्रबीज चळचि घाली घाला।
करिता दानधर्म पुढे भोगविती फळा।
सोवळे मिरविता विधीनिषेध आगळा।
आता धणीवरी ध्याऊ या गोपाळा वो ।।५।।
ऐसे शोधियेले मार्ग नानापरी।
नयेचि प्रतीती मग सांडियेले दुरी।
आता गाऊनी गिती नाचू हा मुरारी।
निळा म्हणे करू संसारा बोहरी वो ।।६।।
वारकरी संप्रदायातील संतांनी कर्मकांड नाकारून भक्तिप्रेमाचा पुरस्कार केला. साहजिकच संतांच्या अभंगात भक्तिप्रेमाविरहित कर्मकांडाचा सतत निषेध केलेला आहे. विशेषत: यज्ञयाग, योगाभ्यास, तीर्थयात्रा, मंत्रजप, तपश्चर्या, सोवळे-ओवळे, दानधर्म आणि अशाच इतरही गोष्टी वारकरी संतांनी नाकारलेल्या आहेत. या साधना परमार्थाला पूरक तर नाहीतच, उलट हानिकारकच आहेत. प्रस्तुत अभंगात निळोबारायांनी या सर्व साधना आणि ब्रह्मज्ञानाच्या मर्यादा अधोरेखित केलेल्या आहेत. कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान या मार्गाने श्रीहरीची अर्थात ईश्वराची प्राप्ती होणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.
संतांच्या अभंगातून सतत इतर साधनामार्गातला फोलपणा सांगितला गेला आहे. साहजिकच या साधनामार्गातून ज्यांचा व्यवसाय चालत होता त्यांना संतांविषयी अकारण द्वेष निर्माण झाला. त्यांनी संतांचा छळ करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक या प्रकारच्या कर्मकांडातून कोणताही सुखाचा लाभ होत नाही. याउलट संतबोधाने मानवी जिवाला आनंदाचा अनुभव येतो. कारण संतबोधामुळे बुद्धीचा मळ निघून जातो. उपरोल्लेखित अभंगाच्या धृपदात निळोबाराय तेच सांगतात. संतबोधाने बुद्धीचा मळ निघून जातो.
संतबोधाची परिणामकारकता सांगणारा एक प्रसंग दादा महाराज सातारकर यांच्या चरित्रात आला आहे. एकदा दादा महाराज नाशिकला गोदाघाटावर कीर्तन करत होते. हा घाट वारकरी कीर्तनासाठी प्रसिद्ध होता. या घाटावर वारकरी कीर्तनकारावर पुरोहित मंडळी शेणमार करायची. वारकरी कीर्तनातून संतमार्गाचा महिमा सांगताना इतर साधनामार्गाचा फोलपणा आपोआप सांगितला जातो. गोदाघाट म्हणजे पुरोहितांचा अड्डाच. त्यांचा व्यवसायच कर्मकांडाचा होता. त्यांची भूमिकाही वर्चस्ववादाची होती. साहजिकच ते वारकरी कीर्तनकाराला विरोध करत. दादा महाराजांना याची कल्पना असूनही त्यांनी ‘भक्तिप्रेमसुख नेणवे आणिका। पंडित वाचका ज्ञानियांसी।।’ हा अभंग निरुपणाला घेतला. घाटावर बरीच ब्राह्मण पुरोहित मंडळी जमली होती. दादा महाराजांनी अभंगावर निरुपण करताना इतर साधनांच्या तुलनेने वारकरी संतबोधाची श्रेष्ठता पटवून दिली. शेवटी ते म्हणाले, ‘या घाटावर वत्तäयावर शेणमार होतो हे मला ठाऊक आहे. आपण कदाचित माझ्यावर शेणमार कराल. पण तो ही गंगामाई धुऊन काढील. पण माझा संतबोधाचा शिडकाव तुमच्या अंतरातून वाटेल ते झाले तरी धुवून जाऊ शकणार नाही, एवढे लक्षात ठेवा.’ वारकरी संतबोध एकदा अंतरंगात रुजला की इतर साधनांची गरज राहत नाही हेच या कथेतून दिसतं.
वारकरी संतांनी इतर कर्मकांडाचा निषेध केवळ विरोधापोटी केला नव्हता. त्यामागे भक्तिप्रेमाची तात्विक भूमिका होती. तीच भूमिका प्रस्तुत अभंगातून निळोबाराय मांडतात.
निळोबाराय हे तुकोबारायांचे अनुयायी. तीच त्यांची ओळख. तुकोबारायांनंतर जवळपास २०-२५ वर्षांनी निळोबारायांचा जन्म झाला होता. तुकोबारायांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज देहूकर यांच्या मुखातून तुकोबारायांचे चरित्र ऐकून ते प्रभावित झाले. त्यांना तुकोबारायांचा ध्यास लागला. निळोबारायांनी पूर्वायुष्यात अनेक प्रकारच्या साधना केल्या असाव्यात. वारकरी संप्रदायात आल्यानंतर त्यांना या साधनांचे वैय्यर्थ अनुभवाला आले. त्यामुळेच त्यांनी या अभंगातून इतर मार्गांचा निषेध केला. निळोबांच्या गाथेत हा अभंग विरहिणीच्या सदरात दिलेला आहे. विरहिणी म्हणजे ईश्वराच्या विरहभावाच्या तळतळीतून केलेल्या अभंगरचना. ही रचना विरहाची नसून मीलनाची आहे. काहीजण या रचनेला गवळणही म्हणतात. वारकर्‍यांच्या सकाळच्या भजनात म्हणजेच काकडा भजनात हा अभंग म्हटला जातो. वास्तविक पाहता विरह जितका दीर्घकाळाचा आणि असह्य असेल तितका मीलनाच्या सुखाचा दर्जा उंचावतो. नानाविध साधनाच्या खटपटीतच अडकून पडल्यामुळे दीर्घकाळ ईश्वराचा विरह घडला होता. पुढे संतांच्या मार्गाने गेल्यामुळे तो आनंदाचा अनुभव आला. हा अनुभव या अभंगातून निळोबारायांनी व्यक्त केलाय. त्यासाठी ईश्वरप्राप्तीच्या वेगवेगळ्या मार्गाच्या मर्यादा सांगितल्या आहेत.
निळोबाराय पहिली मर्यादा सांगतात ती ईश्वराला जाणण्याची म्हणजेच ब्रह्मज्ञानाची. उपनिषदादि ग्रंथातून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते असं सांगितलं जातं. त्यात पहिला अडथळा आहे तो अधिकारभेदाचा. ब्रह्मज्ञानासाठी जे ग्रंथ वाचायचे त्याचा अधिकार स्त्रियांना आणि शूद्रातिशूद्रांना नाही. समाजातल्या या मोठ्या घटकाला ब्रह्मज्ञानाचा अधिकार नाही. ज्यांना अधिकार आहे त्यांना तर फार मोठा धोका आहे, तो आहे जाणीवेचा. जाणीव म्हणजे अहंकार. तुकोबाराय सांगतात, ‘अक्षरे आणती अंगासी जाणीव। इच्छा ते गौरव पूज्य व्हावे।।’ अक्षरविद्येचा धोका म्हणजे सर्वत्र पूज्य होण्याची जाणीव प्रबळ होते. ‘राजा फक्त त्याच्या राज्यापुरता तर विद्वान सगळीकडे पूजला जातो’ अशा आशयाचं एक वचनवजा सुभाषित आहे. याचा अर्थ विद्वता मिळवली जाते ती केवळ पूज्यतेसाठी. त्यामुळेच अक्षरविद्येचा अर्थात ब्रह्मज्ञानाचा अधिकार आपल्याला नाही याचं तुकोबारायांना समाधान वाटतं. ‘घोकाया अक्षर । मज नाही अधिकार ।।’ असं तुकोबाराय समाधानाने म्हणतात. निळोबाराय त्याच चरणात योगमार्गाचीही मर्यादा सांगतात. योगाचा हेतू सिद्धींची प्राप्ती असतो. वास्तविक पाहता योगमार्गाने सिद्धी प्राप्त होत नाहीच. ‘योगयागविधी येणे नोहे सिद्धी’ हा माऊलींचा सिद्धांतच आहे. योगमार्गाने सिद्धी प्राप्त झाल्याचा फक्त आभास होतो. त्यामुळे योगी फसतो. त्याला ईश्वराचं दर्शन घडत नाही. तो ‘योगिया दुर्लभ’ आहे, असं त्यामुळेच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. योगाभ्यासाच्या सिद्धी ईश्वरप्राप्तीच्या वाटा अडवतात असं निळोबाराय म्हणतात.
निळोबाराय चौथ्या चरणात या ईश्वरप्राप्तीसाठी हानिकारक ठरणार्‍या साधनामार्गांची यादी आणखी वाढवतात. पहिली मर्यादा सांगतात ती यज्ञाची. स्वर्गभोगाच्या आमिषाला बळी पडून लोक यज्ञयाग करतात आणि फसतात. काही लोक तपश्चर्यादी साधने करतात. पण त्यामुळे त्यांचे कामक्रोधादि विकार बळावतात. कामक्रोधाचं शमन होण्याऐवजी दमन झाल्यानं हे विकार त्याला आतून पोखरून टाकतात. त्यामुळेच वरकरणी तपादी साधनांचे ढोंग करणारे लोक आतून वासनाविकारांचे बळी असतात. त्यामुळेच
‘करोत तपादी साधने।
कोणी साधोत गोरांजने ।।१।।
आम्ही न वजो तया वाटा।
नाचू पंढरी चोहटा ।।२।।’
असा तुकोबारायांचा निर्धार आहे.
पुढे निळोबाराय ‘नित्या नित्य ज्ञाने अभिमान वाढती।’ असं म्हणतात. ज्ञानाने अभिमान वाढतो. एकनाथ महाराजांनी अशा ब्रह्मज्ञानी पंडितांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांची मुका या रुपकाची एक अभंगरचना आहे. त्यात ते म्हणतात,
‘होतो पंडित महाज्ञानी।
दशग्रंथी षडशास्त्र पुराणी ।
चारी वेद मुखोद्गत वाणी।
गर्वामध्ये झाली सर्व हानी।।’
चार वेदांचा, सहा शास्त्रांचा आणि अठरा पुराणांचा अभ्यास असलेला दशग्रंथी पंडित त्याचं ज्ञान वाया घालवतो ते फक्त अहंकारी वृत्तीमुळे. त्यामुळे नित्यानित्य ज्ञानाच्या मार्गाने फक्त अभिमान वाढतो. तसाच तीर्थभ्रमण करणार्‍या तीर्थभ्रामकांचाही वाढतो. तो अहंकार त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरतो.
पाचव्या चरणात निळोबाराय आणखी तीन मार्गाच्या मर्यादा मांडतात. त्यातला पहिला मार्ग म्हणजे बीजमंत्राच्या जपाचा. जप करताना मंत्रोच्चाराला फार महत्त्व आहे. आरोह-अवरोहाचं ज्ञान त्यासाठी आवश्यक आहे. तालस्वरात आणि शब्दोच्चारात थोडी जरी चूक झाली तर त्याला मंत्र ‘चळला’ असं म्हणतात. या मंत्रचळामुळे लाभ सोडा, उलट हानीच होते. ‘मंत्र चळे थोडा । तरी धडची होय वेडा ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. त्यांच्या आणखी एका अभंगात नाममंत्राची आणि जपजाप्याची तुलना आलेली आहे. तुकोबाराय म्हणतात,
‘मंत्र चळे पिसे लागते सत्वर।
अबद्ध ते फार तरले नामे ।।१।।
अशौचता बाधी आणिका अक्षरा ।
नाम निदसुरा घेता तरे ।।२।।
रागज्ञानघात चुकता होय वेळ ।
नाम सर्वकाळ शुभदायक ।।३।।
आणिका भजनाविधि बोलिला निषेध।
नाम ते अभेद सकळा मुखी ।।४।।
तुका म्हणे तपे घालिती घालणी ।
वेश्या उद्धरुनि नेली नामे ।।५।।’
या अभंगात तुकोबाराय मंत्रजप आणि नामस्मरणाची तुलना करतात. मंत्रचळामुळे अनेकजण वेडे झाले तर नामस्मरणाने वेडे लोक शहाणे होऊन तरले. मंत्रजपासाठी शुचिर्भूत होण्याची गरज आहे तर नामस्मरण अंघोळीच्या आधी अर्धवट झोपेत घेतलं तरी चालतं. मंत्रजपात राग आणि स्वराच्या ज्ञानाची आवश्यकता आहे. त्यात चूक झाली तर घात होतो. नामस्मरणात मात्र कोणतीही वेळ शुभ मानली जाते. इतर मंत्रजपासाठी अधिकारभेद आहेत. उदा. वेदमंत्र उच्चारणाचा अधिकार फक्त ब्राह्मण पुरुषांनाच आहे. याउलट नामस्मरणात अभेद आहे. नामाचा उच्चार कोणत्याही मानवाला करता येतो. नामस्मरणाने वेश्येचाही उद्धार होतो. त्यामुळे नामस्मरणाला स्वराची गरज नाही. अधिकारभेद नाही. वेळेचं बंधन नाही. शुचिर्भूत होण्याची गरज नाही. त्यामुळेच वारकरी संतांनी मंत्रजपाचा मार्ग नाकारत नामस्मरणाचा मार्ग सांगितला आहे. दानधर्माने फळभोगाची आशा वाढते. सोवळ्या-ओवळ्याच्या मार्गाने देवाचा पूजापाठ करावा तर त्यातही विधिनिषेध आहेच. उलट वारकरी संप्रदायातल्या देवाला सोवळ्या ओवळ्याची गरज नाही. त्यामुळेच शेख महंमदबाबांनी ‘ऐसे केले त्या गोपाळे । नाही सोवळे ओवळे।।’ असं म्हटलेलं आहे.
या अभंगात इतर साधनामार्गाने घडलेला ईश्वराचा विरह निळोबारायांनी मांडला आहे. शिवाय ईश्वराच्या अनुभवाचाही मार्ग सांगितला आहे. तो मार्ग संतांचा आहे. या मार्गात कोणताही अडथळा नाही. इतर मार्गात एवढे अडथळे आहेत की ईश्वराचा अनुभव येणे सोडा, त्याच्या दारातही पोचता येणार नाही. त्यामुळेच ‘नाना साधनाच्या केल्या खटपटा। परि त्या न पवती याचिया दारवंटा।’ असं निळोबाराय म्हणतात.
हे सगळे मार्ग नाकारुन निळोबाराय संतांचा मार्ग सांगतात. त्यात कोणताच अडथळा नाही. तुकोबारायांच्या भाषेत हा मार्ग सोपा आणि सुखरूप आहे. ‘तुका म्हणे मज धाडिले निरोपा। मार्ग हा सोपा सुखरुप।।’ असं ते म्हणतात. प्रेमभक्तीचा हा प्रशस्त राजमार्ग आहे. त्यात ईश्वराच्या गुणानुवर्णनाचं गायन आहे. त्याच रंगात रंगून नाचणं आहे. ‘स्वल्प वाटे चला जाऊ। वाचे गाऊ विठ्ठल।।’ अशी ही स्वल्प म्हणजे जवळची वाट आहे. या मार्गात अधिकारभेदही नाही. इथे सकळांसी अधिकार आहे.
या वारकरी मार्गात अभिमानाचा लवलेशही नसतो. याचं कारण इथे संत बुद्धीचा मळ फेडतात. ती निर्मळ करतात. ती निर्मळ झाली की ईश्वराचं दर्शन झालंच. त्यामुळेच निळोबाराय ‘त्यानी फेडियेला बुद्धीचा वो मळ।।’ असं म्हणतात. संतबोधाची स्पष्टता आली की कोणताही मानव उच्च दर्जाच्या आनंदाचा अनुभव घेऊ शकतो.

Previous Post

अरेरे, राहुल बोले, भाजप हाले!

Next Post

भाजपचे अच्छे दिन संपुष्टात येणार?

Next Post

भाजपचे अच्छे दिन संपुष्टात येणार?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.