पहलगामच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्त्वाखाली भारताने पाकिस्तानला धडा शिकवला, असा प्रचार भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या बोळ्याने दूध पिणार्या गोदी मीडियाने चालवला आहे. पाकिस्तानला नेमका काय धडा शिकवला, याचं त्यांच्याकडे उत्तर नाही. पाकिस्तानची खोड मोडण्याची क्षमता असलेलं ऑपरेशन सिंदूर अमेरिकेने हस्तक्षेप करून थांबवलं आणि व्यापार बंद करण्याची धमकी देऊन थांबवलं, हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा अजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोडून काढलेला नाही. शिवाय हे ऑपरेशन म्हणजे पाकिस्तानला पूर्वकल्पना देऊन केलेला एक सर्जिकल स्ट्राइक होता, अशी कबुली तर साक्षात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीच देऊन झाली आहे. मग आपण नेमका विजय कसला मिळवला? स्व. इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना त्यांनी मोरारजी देसाईंना किती खमकेपणाने सांगितलं होतं पाकिस्तानकडून असलेल्या धोक्याबद्दल, ते बाळासाहेबांनी या व्यंगचित्रात दाखवून दिलेलं आहे. मस्तवाल पाकिस्तानने अमेरिकेच्या बळावर भारताला धडक देण्याची हिंमत दाखवली तेव्हा इंदिरा गांधींनी अमेरिकेला धुडकावून पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते, बांगलादेशाची निर्मिती करून धर्माधिष्ठित फाळणीचा वैचारिक पायाच नष्ट करून टाकला होता… आज ट्रम्पचा आदेश येताच सरेंडर करणार्या बुळचट राज्यकर्त्यांना बाळासाहेबांनी कसे कुंचल्याचे फटकारे दिले असते, त्याची कल्पनाच किती रोमांचक आहे!