आपण सर्वजण गर्दीतली माणसं… कुठे काही प्रसंग घडला की लगेच धावत जाऊन बघ्याची भूमिका घेणारी. काहीजण मात्र गर्दीत उभे न राहता समोरच्या प्रसंगानुरूप वागणारे. वाईट घटना असेल तर मदतीला धावून जाणारे. काहीजण प्रसंगाला शब्दांचा आधार देऊन लोकांपर्यंत पोहचविणारे, तर काही चित्राद्वारे त्या प्रसंगाला जिवंत करणारे. आम्हाला डोळे असतात, त्यांना दृष्टी असते. काही माणसं वेड घेऊनच जन्माला येतात. अनेकदा तर या वेडाचा त्यांच्या अख्ख्या सात पिढीत मागमूसही नसतो.
आता हेच बघा ना! आपल्या मोठ्या भावाच्या सलूनमध्ये त्याचा सात वर्षाचा लहान भाऊ रोज जाऊन बसतो. एकदा तो बघतो की समोरून एक फकीर कसलेसे गाणे म्हणत जात आहे. खरे तर असे अनेक फकीर, साधू, वासुदेव गाणी म्हणत भिक्षा मागणारे आम्हीही लहानपणी बघितले असणार. पण हा त्या फकिराचा पाठलाग करत जातो. नंतर तर त्याला सवयच जडते त्याच्या मागे जायची. कारण त्या फकीराच्या सुराने त्याच्यावर जादू केलीय असे त्याला वाटू लागते. मग तो स्वत:ही त्याच्यासारखेच गुणगुणायला लागतो. या गुणगुणण्यामधून पुढे काय घडणार हे त्या पोरसवदा मुलाला कळलं होतं का?
हा काळ १९३१चा, म्हणजे ज्यावेळी सैगल नावाच्या संगीतातल्या अवलियाने सर्वांवर आपल्या आवाजाची जादू केली होती. अमृतसरमधल्या त्या अवलियाचा आणि या फकिरामागे जाणार्या या पोराचा नियतीने काहीतरी मेळ बसविण्याचे पक्के केले असावे. त्याने केलेल्या फकिराच्या नकलांमुळे दुकानातली गर्दी वाढू लागली. लोक बराच वेळ तिथे बसू लागले. पोरगा छान गातो की! असे सर्वच म्हणू लागले. मोठ्या भावाला बहुतेक लक्षात आले असावे की ‘हा आपल्या कुटुंबातील इतरांपेक्षा वेगळा आहे. आपल्या अख्ख्या कुटुंबाच्या पिढीत असा गाण्याबिण्याचा कुणाला छंद नव्हता… मग याच्यात हे कुठून आले? कदाचित अल्लाची मर्जी असेल.’ त्यावेळी किराणा घराण्याचे अब्दुल वाहिद खान हे संगीतातले मोठे प्रस्थ होते. मग मोहम्मद हमीद या त्याच्या मोठ्या भावाने याला खान साहेबांकडे संगीताचे शिक्षण घेण्यासाठी पाठवून दिले. नंतर पं. जीवनलाल मट्टू व फिरोज निझामी यांच्याकडेही शागीर्दी केली. याचा परिणाम म्हणजे त्याच्या सुरांची बैठक भक्कम व्हायला मदत झाली.
ऑल इंडिया लाहोरने एकदा सैगल यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या सहा-सात वर्षाच्या काळात हा पोरगा सैगलच्या आवाजाने अत्यंत प्रभावी झाला होता. तो कार्यक्रम ऐकायला मग तो आपल्या भावासोबत तेथे गेला. कार्यक्रम चालू असताना अचानक वीज गेली. सैगल साहेब गाणे थांबवत म्हणाले, वीज आल्यावर पुढे सुरू करू. हळूहळू लोकांचा गोंधळ सुरू झाला. तेव्हा मोहम्मद हमीद यांनी आयोजकांना विनंती केली की वीज येईपर्यंत माझ्या भावाला गायची संधी द्या म्हणजे लोकांचा गोंधळही कमी होईल. मग या पोराने गायला सुरुवात केली… हळूहळू सगळेच त्याच्या आवाजाने शांत झाले. मोहम्मद रफी त्यावेळी १३ वर्षांचे होते आणि हा त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम होता.
चित्रपटसृष्टीत सर्वच त्यांना प्रेमाने रफी साहेब म्हणत असत. रफी हा मूळ अरेबिक शब्द, ज्याचा अर्थ उमदा, थोर वा उच्चकुलीन असा होतो. रफीने पुढे आपल्या नावाचा हा अर्थ सिद्धही करून दाखवला. १९७८ सालातील गोष्ट. मुकेशच्या स्मृतीप्रित्यर्थ मुंबईतील किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद हॉलमध्ये संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. त्या काळात मी मुंबईला जे.जे.च्या पहिल्या वर्षाला होतो. कार्यक्रम रात्री १२ वाजता सुरू होऊन रात्रभर चालणार होता. हे प्रेक्षागृह खूप मोठे. मला दुसर्या गॅलरीतले सगळ्यात मागचे तिकीट मिळाले. त्यावेळी माझी ऐपत तेवढीच होती. मुख्य पाहुणे म्हणून त्या वेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हजर होते. संगीत रजनीपूर्वी वक्त्यांची नेहमीची भाषणबाजी सुरू झाली. शेवटी मुख्यमंत्री बोलायला उठले. त्यांचे भाषण काही लवकर संपेना. लोकांची चुळबूळ सुरू झाली आणि अचानक कुणीतरी म्हणाले, ‘रफीसाहब आये… रफीसाहब आये…’ सगळे प्रेक्षक उठून उभे राहिले… पांढरा शुभ्र हाफ शर्ट, पांढरी शुभ्र पँट आणि त्यांचं नेहमीचे प्रसन्न हास्य… मी त्यांच्यापासून खूपच लांब होतो, पण मनाने मात्र त्यांच्या अगदी जवळ… सर्वांना हात जोडत ते स्टेजवर गेले… मी रफीला पहिल्यांदा आणि शेवटचे येथे पाहिले… खरे तर त्या काळात किशोरदाची खूप चलती होती, पण रफी साहेबची लोकप्रियता त्यावेळीही तशीच होती, जी ६०च्या दशकात होती. मी ज्या लोकलने रोज प्रवास करायचो त्यावरचे किंग्ज सर्कल हे दुसरेच स्टेशन. या स्टेशनवर लोकल थांबली की मला रफीसाहेब नेहमीच आठवत… मीच काय असे लाखोजण असतील की ज्यांनी रफीसाहेबांना फक्त ‘महसूस’ केलेय आणि आजही करत आहेत. आपल्या कुटुंबीयांइतकीच त्यांच्या मुलायम मधाळ सुरांनी आम्हाला कायम सोबत केलीय सर्वच प्रसंगात आणि आजही करत आहेत. सूर सच्चे असले की ते आपोआप कानावाटे थेट हृदयात उतरतात.
१३ वर्षांचे रफी गात होते तेव्हा प्रेक्षकांत त्या काळातील एक प्रसिद्ध संगीतकारही बसलेले होते. श्यामसुंदर. त्यांना रफीच्या आवाजाने प्रभावित केले. त्यांनी रफीला आपल्याकडे गाण्यासाठी आमंत्रण दिले. श्यामसुंदर यांनी ‘गुल बलोच’ या पंजाबी चित्रपटासाठी रफीला पार्श्वगायनाची पहिली संधी दिली. हे एक द्वंद्वगीत होते जे त्यांनी झीनत बेगम या गायिकेबरोबर गायले. बोल होते, ‘सोनिये नी.. हिरये नी…’ हा चित्रपट २८ फेब्रुवारी १९४४ रोजी प्रदर्शित झाला. त्याच वर्षी त्यांना लाहोर रेडिओ केंद्राने गायक म्हणून येण्याचे आमंत्रण दिले.
रफीसाहेबांना त्यांचे मोठे बंधू १९४४मध्ये मुंबईला घेऊन आले. मला रफीइतकाच आदर त्यांच्या मोठ्या बंधूबद्दलही वाटतो. त्या काळात गाणे बजावणे हे मुळीच प्रतिष्ठेचे समजले जात नव्हते. घरातले बहुदा सर्वजण कडाडून विरोध करत. पण मोहम्मद हमीद यांनी मात्र आपल्या भावाला मनापासून साथ दिली नसती तर हा हिरा कुठेतरी अडगळीत पडून तेज गमावून बसला असता. त्यांनी मुंबईतल्या भेंडी बाजार या गजबजलेल्या परिसरात दहा बाय दहाची रूम भाड्याने घेतली आणि तेथे राहून रफीसोबत तेही संघर्ष करू लागले. तन्वीर नकवी नावाचे एक उर्दू शायर त्यावेळी रफीच्या संपर्कात आले. त्यांनी प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ए. आर. कारदार, मेहबूब खान आणि निर्माते अभिनेते नजीर यांच्या भेटी घालून दिल्या. त्यावेळी श्यामसुंदरही मुंबईत होते. त्यांनी पुन्हा एकदा रफीसाहेबांना संधी दिली. त्यावेळचे प्रसिद्ध गायक जी. एम. दुर्रानी यांच्यासोबत रफीसाहेबांनी गायलेल्या गाण्याचे बोल होते, ‘अजी दिल हो काबू में तो दिलदार की ऐसी तैसी…’ चित्रपट होता ‘गाँव की गोरी’. रफी साहेबांचे रेकॉर्ड झालेले हे पहिले हिंदी चित्रपटगीत होते.
अमृतसरजवळच्या कोटला सुलतान सिंघ या छोट्याशा गावातल्या हाजी अली मोहमद यांच्या सहा मुलांपैकी रफी हे दुसर्या क्रमांकाचे अपत्य… लहानपणी सर्वजण रफीला ‘फिको’ या टोपणनावाने हाक मारत. ‘फिको’ या शब्दाचा ज्योतिष्य आणि आकडेशास्त्रात ढोबळ अर्थ असा की बदल स्वीकारा, लगेच निर्णयाप्रत येऊ नका, एखाद्याचे ऋण विसरू नका व परिस्थितीनुसार जुळते घ्या… संबंध आयुष्यात हेही नियम रफीसाहेबांनी पाळले. कोटला सुलतान सिंघच्या गल्लीत फकीरामागे धावणार्या या मुलाने मग अख्ख्या देशालाच नाही तर जगालाही आपल्यामागे धावायला भाग पाडले.
रफीच्या आवाजाचा पल्ला आणि त्यांचे सर्वच सप्तकांतून लिलया फिरण्याचे कसब खरे ओळखले ते संगीतकार नौशाद अली यांनी. नौशादही संगीताच्या वेडापायी घरदार सोडून मुंबईला पळून आलेल्यांपैकी एक होते. नौशादनी रफीच्या आवाजाचा सर्वप्रथम वापर केला तो एका कोरस गाण्यात. चित्रपट होता ए. के. कारदार यांचा ‘पहले आप’. गायक श्यामकुमार, अल्लाऊद्दीन यांच्यासोबत त्यांनी ‘हिंदुस्तान के हम हैं’ हे गाणे गायले. शिवाय सैगल साहेबांबरोबर ‘शहाजहान’ या चित्रपटासाठीही ते कोरसमध्ये होते. काय योगायोग आहे बघा… ज्या आवाजाचा तो स्वत: भक्त होता त्या सैगलबरोबर कोरसमध्ये का होईना गाण्याची संधी रफीला मिळाली. म्हणजेच त्यांचा प्रवास योग्य दिशेने सुरू झाला होता. १९४५मध्ये त्यांना दोन चित्रपट मिळाले. त्यापैकी लैला मजनू या चित्रपटातील ‘तेरा जलवा जिसने देखा’ हे गाणे पडद्यावरही त्यांनीच गायले. १९४६मधील ‘अनमोल घडी’ या चित्रपटातील ‘तेरा खिलौना टुटा बालक’ आणि १९४७मधील ‘जुगनू’ चित्रपटातील नूरजहाँ यांच्यासोबतच्या द्वंद्वगीताने मात्र खर्या अर्थाने रफीने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. देशाच्या फाळणीनंतर नूरजहाँ पाकिस्तानला गेल्या, मात्र रफीसाहेब येथेच राहिले.
सैगल आणि दुर्राणी या गायकांचा रफीवर सुरुवातीस खूपच प्रभाव होता. महात्मा गांधींच्या हत्येनंतर देश दु:खात बुडाला. याचवेळी संगीतकार हुस्नलाल-भगतराम, गीतकार राजेंद्र कृष्ण आणि रफी यांनी रातोरात ‘सुनो सुनो ए दुनियावालो, बापूजी की अमर कहानी…’ या गाण्याची निर्मिती करून सर्वांवर मोहिनी घातली. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी या टीमला बोलावून घेतले आणि समोर बसून हे गाणे ऐकले. १९४८च्या स्वातंत्र्यदिनी नेहरूंनी २४ वर्षांच्या रफी साहेबाचा चांदीचे पदक देऊन गौरव केला.
१९५० ते ६० हे दशक पूर्णपणे रफीचे होते, असे म्हणायला हरकत नाही. या काळात मुकेश, मन्ना डे, हेमंत कुमार, किशोर कुमार, तलत मेहमूद हे मुख्य प्रवाहात होते. पण प्रत्येकाच्या आवाजाच्या काही मर्यादा होत्या, त्यामुळे बरीचशी विभागणी झाली होती. रफीचा आवाज मात्र कोणत्याही अभिनेत्याला सूट होत असे. मी तर म्हणेन की रफीसाहेब प्रत्येक अभिनेत्याचा अभ्यास करून त्याला चपखल बसेल अशा आवाजात गात. त्यामुळे राजेंद्र कुमार, दिलीप कुमार, प्रदीप कुमार, भारत भूषण, शम्मी कपूर, धर्मेंद्र, राजकुमार, जॉनी वॉकर, मेहमूद, विश्वजीत, जॉय मुखर्जी या सर्वांसाठी हा आवाज फिट बसत असे. गंमत म्हणजे १९५८मधील ‘रागिनी’ नावाच्या चित्रपटात किशोर कुमारला रफी साहेबांनी उसना आवाज दिला होता. गाणे होते, ‘मन मोरा बावरा’ आणि संगीतकार होते ओ. पी. नय्यर. ‘प्यार दिवाना’मध्येही किशोरदा रफीच्या आवाजात गायले. गाणे होते, ‘अपनी आदत हे सबको सलाम करना…’ १९७२मध्ये आलेल्या व लाला सत्तार यांचे संगीत असलेल्या या कृष्णधवल चित्रपटात मुमताज किशोरदाची नायिका होती. स्वतंत्र नायक म्हणून हा किशोरदांचा शेवटचा चित्रपट होता. शरारत (१९५९), बागी शहजादा (१९६४) या चित्रपटा’तही किशोरदाला रफी साहेबांचा आवाज आहे. सुरुवातीला त्यांनी केलेल्या शास्त्रीय संगीताच्या रियाजामुळे मुळातच मधुर असलेल्या आवाजाला आणखी धार चढली.
गाणे कुठलेही असो रफी त्यात सर्वस्व पणाला लावत. शम्मी कपूरसाठी गायलेल्या उडत्या चाली, दिलीप कुमारसाठी गायलेली विरहगीते, भारत भूषणसाठी गायलेली कव्वाली, प्रदीप कुमारसाठी स्वप्नाळू गाणे, मेहमूदसाठी गायलेले हैद्राबादी ढंगाचे गाणे, जॉनी वॉकरसाठी दारुड्याचे गाणे, राजेंद्र कुमारसाठी गायलेली प्रेमगीते… त्यांचा आवाज सर्वत्र कान तृप्त करीत असे. नौशादनी तर त्यांच्याकडून सर्वच प्रकारची गाणी गाऊन घेतली. १९५१मध्ये आलेल्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटासाठी खरे तर त्यांची पहिली पसंती तलत मेहमूदला होती. पण त्याच्या हातातली सिगारेट बघून त्यांनी रफीला सर्व गाणी दिली आणि रफी साहेबांनी त्यात सर्वस्व ओतले. या चित्रपटाचे निर्माते एकदा नौशाद साहेबांकडे गेले आणि म्हणाले ‘मला कंपनी बंद करायची आहे, पण टाळे तुमच्या हाताने लावायचे आहे.’’ यावर नौशाद म्हणाले, आपण एक शेवटचा चित्रपट काढू. नाहीच चालला तर कंपनी बंद करा. नंतर बैजूच्या कथेवर चित्रपट बनवायचे ठरले आणि त्याने इतिहास निर्माण केला. या चित्रपटात १३ गाणी होती आणि सर्वच्या सर्व सुपरहिट झाली. हा चित्रपट यशस्वी होण्याचे सर्व श्रेय नौशाद, रफी आणि शकील बदायुनी या तिघानांच जाते. या चित्रपटाने रफीतील सर्वच प्रतिभा बाहेर आणली. ‘मन तरपत हरी दर्शन को आज’ आणि ‘ओ दुनिया के रखवाले’ या गाण्यात त्याचा टिपेतला तार सप्तकातला आवाज आजही गायकासाठी खुले आव्हान आहे. नौशादकडे रफीनी गायलेल्या जवळपास १५० गाण्यापैकी ८० गाणे सोलो आहेत.
नौशादनंतर शंकर जयकिशन या जोडीनेही रफीच्या आवाजाचा पोत लक्षात घेऊन असंख्य गाणी तयार केली. राज कपूरचा पडद्यावरचा आवाज मुकेश, पण तरीही अनेकदा रफीचा आवाज त्यांच्यासाठी वापरण्यात आला. शम्मी कपूरने एकदा मुलाखतीत सांगितले होते की, ‘रफी अभिनेत्याचा सूक्ष्म अभ्यास करतो. त्याच्या ओठांच्या हालचाली, त्याचा घशावर पडणारा ताण, अभिनय करतानाचे हावभाव याचा पूर्ण अभ्यास करून रफी आवाजात योग्य ते बदल करीत असत. माझ्या यशात सर्वात मोठा वाटा रफी साहेबांचा आहे…’ शंकर जयकिशन यांच्या चित्रपटांत रफींनी, तेरी प्यारी प्यारी सुरत को, बहारो फूल बरसाओ, दिल के झरोकों में, चाहे कोई मुझे जंगली कहे, अजब है दास्तां तेरी ऐ जिंदगी (किशोर कुमारसाठी), याद न जाए बिते दिनों की, लाल छडी मैदान खडी, दिल तेरा दिवाना है सनम, आवाज दे के हमे ना बुलाओ, ए गुलबदन, मैं गाऊं तुम सो जाओ, ए मेरे शाहे खुबा, आसमान से आया फरिश्ता, बदन पर चमकते सितारे, शिकार करने को आए, यकीन कर लो, सौ साल पहले मुझे तुमसे… अशा एकापेक्षा एक गाण्यांचा रत्नहारच पेश केला. शंकर जयकिशनकडे रफी साहेबांनी ३४३ गाणी गायली ज्यातील २१६ सोलो होती.
ओ. पी. नय्यर यांनीही रफीकडून सुंदर गाणी गाऊन घेतली आहेत. कश्मीर की कली, आरपार, सीआयडी, नया दौर, तुमसा नही देखा.. वगैरे. ओ.पीं.नी रफी साहेबांकडून जवळपास २०० गाणी गाऊन घेतली. तेही म्हणत की, रफी नसता तर मीही नसतो…आशा व रफीचे वेगळे कॉम्बिनेशन घेऊन ओपींनी अनेक प्रयोग केले व ते यशस्वीही झाले. सचिनदांचा आवडता गायक तसा किशोर कुमार, पण त्यांनी देव आनंदसाठी रफीकडून अप्रतिम गाणी गाऊन घेतली. गाईडमधील रफीची सर्वच गाणी माईलस्टोन आहेत. त्यांच्या जवळपास ३७ चित्रपटांसाठी रफी साहेब गायले. १९७३मध्ये किशोर कुमारची धूम सुरू असताना ‘अभिमान’ मधले रफी-लताचे ‘तेरी बिंदिया रे’ भाव खाऊन गेले.
संगीतकार रवीकडे गायलेल्या ‘चौदहवी का चाँद हो’ या गाण्याने त्यांना पहिला फिल्मफेअर (१९६०) पुरस्कार मिळवून दिला, तर त्यांच्याकडीलच बाबुल की दुवाँए लेती जा… (१९६८) या गाण्याने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.
चित्रपटातील संगीत वा पार्श्वगायन आणि इतर कुठलेही संगीत वा गायन यात एक मूलभूत फरक आहे. चित्रपट हा तंत्रज्ञान आणि कला यांचा अनोखा संगम आहे. चित्रपटात वेळेला खूप महत्व असते. सबंध चित्रपट एका ठराविक वेळेत बसवायचा असतो. त्यातील गाण्यांना किती वेळ द्यायचा याचेही एक ढोबळ गणित असते. ३ ते ५ मिनिटात गाण्यात किती आणि कसे रंग भरायचे याचे भान गायकाला ठेवावे लागते. या बाबतीत रफी साहेब, लतादीदी व आशाताई खूप निष्णात. आपण कुणीही यांचे थेट आवाज कधी ऐकू शकलो नाही. आपण जे ऐकतो त्यांना ‘मॅटॅलिक व्हाईस’ म्हटले जाते. त्या काळातल्या जाणत्या संगीतकारांचे कान हे अतिशय तीक्ष्ण होते. म्हणून त्यांनी गायकांच्या आवाजाची प्रत ओळखून प्रत्येकाला योग्य न्याय दिला. रफी साहेबांच्या आवाजातच एक माधुर्य होते. ते कोणत्याही सप्तकात गेले तरी सूर कधीच बेसूर होत नसत. म्हणूनच त्यांचे गाणे दुसरे कोणी गाऊ शकत नसत. मन्नादांनी अत्यंत मोकळेपणाने त्यांच्या सुरांना सलाम केला आहे. रफी साहेब रोज तानपुर्यावर रियाज करीत असत. रियाजाने सूर कमालीचे परिपक्व होतात यावर त्यांची श्रद्धा होती. ते स्वत:ही अत्यंत साधे व सरळ इन्सान होते. गाणे हे त्यांच्यासाठी अल्लाची इबादत आणि धर्म होता.
संगीतकार मदन मोहन यांचेही आवडते गायक रफी साहेब होते. मदन मोहन वाद्यांचा वापर कमी करत. त्यामुळे त्यांच्याकडे गायकाचा कस लागत असे. आवाजातले सर्व बारकावे मदन मोहन सहज काढून घेत. मेरी आवाज सुनो, कर चले हम फिदा, तुम जो मिल गये, ये दुनिया ये मैफिल मेरे काम की नहीं, तेरी आंखो के सिवा… अशी अनेक अप्रतिम गाणी रफींनी त्यांच्याकडे गायली. रफी साहेबांनी सगळ्यात जास्त गाणी गायली ती लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासाठी. ‘सलामत रहो’’ आणि ‘वो जब याद आए’ या ‘पारसमणी’ या चित्रपटातील आजही मनाला प्रफुल्लित करणार्या गाण्यांनी लक्ष्मी-प्यारेचा आवाज रफी साहेब बनले ते अगदी शेवटपर्यंत. त्यांनी त्यांच्याकडे ३६९ गाणी गायली. त्यापैकी १८६ सोलो होती. १९६५ सालातील ‘दोस्ती’ या चित्रपटातील ‘चाहूंगा मैं तुझे…’ हे गाणे रफी साहेबांना प्रचंड आवडले होते आणि त्यांनी ते अल्प मानधन घेऊन गायले होते. या गाण्याने त्यांना तिसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. १९६६ सालातील ‘सुरज’ चित्रपटातील ‘बहारों फूल बरसाओ’ या गाण्याने चौथा तर ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील ‘दिल के झरोके में’ या गाण्याने पाचवा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. ५१ वर्षांपूर्वीचे ‘बहारों फूल बरसाओ’ हे गाणे आजही लग्नात बँडवर वाजवले जाते. ही त्या गायक, गीतकार आणि संगीतकाराला मिळालेली दाद आहे. रफी साहेबांनी त्यावेळच्या सर्व गायक सहकार्यांसोबतही गाणे गायले. १९७७ साली लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलेल्या ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटात रफी, मुकेश आणि किशोर बहुदा पहिल्यांदाच एकत्र गायले.
१९६२-६३च्या काळात गायकांना गाण्याची रॉयल्टीही मिळाली पाहिजे या मुद्द्यावरून लतादीदी आणि रफी साहेब यांच्यात दुरावा निर्माण झाला. रफी साहेब म्हणत, आम्ही एकदा गाण्याचे पैसे घेतले आहेत तर मग रॉयल्टी का? हा वाद बराच काळ चालला. लतादीदींनी त्यांच्यासोबत गाणे गायला नकार दिला. शेवटी जयकिशन यांनी दोघांत समेट घडवून आणला.
चित्रपटाच्या मायावी नगरीत रफी साहेब सर्व व्यसनांपासून खूपच लांब राहिले. स्वभावानेही ते खूप लाजाळू होते. संगीतकारांना ते स्वत:हून कधी विचारत नसत की, मला किती पैसे मिळणार आहेत. ते येत आणि गाणे
रेकॉर्ड करून निघून जात. अनेकदा त्यांनी फक्त एक रुपया मोबदला घेऊन गाणे गायले आहे. ‘नील कमल’ चित्रपटातील ‘बाबुल की दुवाँए लेती जा’’ हे गाणे रेकॉर्ड करण्यापूर्वी एक दिवस अगोदर त्यांच्या मुलीची सगाई झाली होती. त्यामुळे हे गाणे गाताना ते खूप भावुक झाले होते. याच गाण्याला त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
गाणे मनासारखे झाले की ते घराच्या छतावर जाऊन पतंग उडवत असत आणि त्यांचा पतंग कटला की लहान मुलांसारखे खिदळतही असत. सोबतच्या सर्वच गायकांबद्दल ते खूपच आदराने बोलत असत. विशेषत: मन्नादांच्या गायकीविषयी भरभरून बोलत. किशोर कुमारला ते किशोरदा म्हणत. स्वत: किशोर कुमार यांना त्यांनी ‘दा’ म्हटलेले आवडत नसे. ते म्हणतही असत की, ‘मी तुमच्यापेक्षा लहान आहे, तुम्ही गायकीत माझ्यापेक्षा मोठे आहात, मला फक्त किशोर म्हणत जा.’’ यावर रफी म्हणत, ‘मी सर्वच बंगाली लोकांना, मग ते लहान असो की मोठे, दा म्हणतो.’’ ते किशोर कुमारचे गाणे मनापासून ऐकत असत व त्यांची स्तुतीही करत असत.
सत्तरच्या दशकात किशोरदा पुन्हा फॉर्मात आले आणि रफी साहब मागे पडू लागले, पण त्या दोघांच्या मैत्रीत अजिबात खंड पडला नाही. आर. डी. बर्मनचा उदय झाल्यावर आणि संगीतातील प्रेक्षकांची रुची बदलल्यामुळे किशोरचा बोलबाला झाला. १९७४मध्ये ‘तेरे गलियों मे ना रखेगें कदम’ या गाण्याने रफींनी पुन्हा दमदार कमबॅक केले. पुन्हा रफी साहेबांची गाणी वाजू लागली. या काळातील त्यांची लैला मजनू, दोस्ताना, हम किसी से कम नहीं, नसीब, सुहाग, अपनापन, सरगम, कुर्बानी, बर्निंग ट्रेन, अमर अकबर अँथनी, जमाने को दिखाना है, शान वगैरे चित्रपटातून ते गात राहिले.
१९७९मध्ये लंडनच्या रॉयल आल्बर्ट हॉलमध्ये त्यांनी लाइव्ह कार्यक्रम केला. अनेक देशांचे दौरे केले. ४० वर्षांच्या कारकीर्दीत रसिकांचे कान अक्षरश: तृप्त केले. अगदी १० ते ८० वयाच्या प्रत्येक माणसाला त्यांच्या आवाजाने भारून टाकले. त्यांनी हिंदीव्यतिरिक्त कोकणी, भोजपूरी, उडीया, पंजाबी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराथी, मैथिली, उर्दू, इंग्लिश, फार्सी, अरेबिक, सिंहली, डच अशा सर्वच भाषांतली गाणी गायली. मराठीत श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत दिग्दर्शनातील त्यांची गाणी खूप गाजली. शोधीशी मानवा राऊळी, हा छंद जिवाला लावी पिसे, हसा मुलांनो हसा, हा रुसवा सोड सखे, प्रभू तू दयाळू अशी कितीतरी सुंदर मराठी गाणी रफी साहेबांनी गायली.
रफी साहेबांचा पहिला निकाह त्यांच्या काकाची मुलगी बशीरन बेगम यांच्याशी वयाच्या १३व्या वर्षीच झाला होता. फाळणीच्या दंग्यात तिचे अनेक नातेवाईक मारले गेल्यामुळे तिने रफीबरोबर भारतात राहण्यास नकार दिला व लाहोरला निघून गेली. त्यांच्यापासून त्यांना एक मुलगाही झाला. रफी साहेबांचा दुसरा निकाह बिल्किस बेगमबरोबर झाला. पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आणि दुसर्या पत्नीपासून खालिद, हामिद, शाहिद ही तीन मुलं तर परवीन, नसरीन आणि यास्मिन या तीन मुली. त्यांची तीनही मुलं आज जगात नाहीत. एवढ्या महान गायकीचा एक टक्काही अंश रफीच्या एकाही मुलांत का बरे आला नसेल? म्हणजे रफीसाहेबांच्या मागच्या पिढ्यांत आणि पुढच्या पिढीतही संगीत नाही असे का?
नियतीला फक्त एकच रफी हवा होता का?
रफी साहेबांचे शेवटचे गाणे होते, ‘शाम क्यूँ उदास है दोस्त, तू कहीं आसपास है दोस्त’. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी हे गाणे रेकॉर्ड केले होते. १९८१च्या ‘आसपास’’ या चित्रपटातील हे गाणे होते. त्यांच्या मृत्यूनंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला. जग सोडण्यापूर्वी त्यांनी असे उदासीचे गाणेच का गावे? संगीतकार जयकिशननेही ‘यहाँ कल क्या हो किसने जाना’ म्हणून का निरोप घ्यावा? साहिरने ‘मैं पल दो पल का शायर हूं’ असे का बरे म्हटले? मुकेशनेही ‘कल खेल में हम हो न हो’ असे म्हणून जग का सोडले? गीता दत्तही ‘वक्तने किया क्या हंसी सितम’ असं म्हणालीच होती की!
३१ जुलै १९८०… आजही मी विसरलेलो नाही. आमचे जेजेचे होस्टेल बांद्रा पूर्वेला कलानगरजवळ. ३० जुलैच्या रात्रीपासूनच पाऊस चालू होता. मी कॉलेजला गेलो नव्हतो. एका मित्राने सकाळी सांगितले, रफी साहेब गेले. मनावर एकदम उदासीचे मळभ दाटून आले. मी तर कधी भेटलो नाही त्यांना, जवळून बघितलेही नाही कधी. जात धर्म प्रांत कशातच सारखेपणा नाही, मग इतकी बोच का लागते?
मी लगेच उठलो. रफी साहेब बांद्रा पश्चिमेला रहात असत, असे मी ऐकले होते. मी बांद्रा स्टेशन गाठले, क्रॉस करून पश्चिमेला आलो. बाहेर लोकांचा प्रचंड जमाव. पावसानेही खूप जोर पकडलेला. पश्चिमेला एक मोठी मशीद आहे तिथे त्यांचे पार्थिव ठेवल्याचे समजले. लोकांचा महापूर त्या दिशेने जात होता. मी त्या गर्दीत सामिल झालो. पुढे सर्व ट्रॅफिक जाम झालेली. एवढ्या पावसातही लोकांचे जथ्थे चारही बाजूने येत होते. चित्रपट जगतातील सर्वच मोठ्या व्यक्ती रफी साहेबांच्या जनाजात सामील झाल्या होत्या.
मशिदीच्या चारही बाजूने उंच भितींचे मोठे कुंपण, ते कुणी क्रॉस करू नये म्हणून काचेचे तुकडे लावलेले, पण त्या भितींवरूनही लोक आत जाण्याचा प्रयत्न करत होते. त्या काचेच्या तुकड्यांची भिंत तितकी जखमी करणारी नव्हती, जितकी रफीच्या जाण्यामुळे चाहत्यांच्या मनांवर जखम झाली होती. मला त्या गर्दीत चालता येईना, म्हणून बाजूच्या इराणी हॉटेलाच्या ओसरीत उभा राहिलो. त्यांची शेवटची जनाजे की नमाज या मशिदीत होत आहे असे कुणीतरी म्हणाले. शेवटच्या नमाजचा तरजुमा असा आहे, ‘ऐ अल्लाह… हम पर इल्मो हिक्मत के दरवाजे खोल दे और हम पर अपनी रहमत नाजिंल फरमा… ऐ अजमत और बुजर्गीवाले…’
अशावेळी रफीची दोन गाणी मला नेहमीच अस्वस्थ करतात. पहिले ‘ये जिंदगी के मेले, दुनिया में कम ना होंगे, अफसोस हम ना होंगे’ तर दुसरे ‘तुम मुझे यूं भूला ना पाओगे’…
आपने सही कहा रफी साहब, हम आप को कभी भूल नहीं पाएगे.