• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

रंगमंचावरले राजकीय व्यंगचित्र!

- संजय डहाळे (तिसरी घंटा) (हौस माझी पुरवा)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 1, 2022
in तिसरी घंटा
0

‘हौस माझी पुरवा’ची मूळ कथा ही निर्माते अजय विचारे यांची असून त्यांच्या वनलाइनवर संतोष पवार याने सारा डोलारा रचला आहे. संहितेपासून ते सादरीकरण्यापर्यंत यात पदोपदी विडंबने आहेत, पण कुठेही मर्यादा ओलांडलेली नाही. राजकीय, सामाजिक कटुता कुशलतेने टाकली आहे. संवादलेखनात त्याचे पुरेपूर भान ठेवले असून कडू औषध गोड वेष्टनात गुंडाळून दिले आहे. यातील एकेक प्रसंगात राजकीय टोलेबाजी आणि चिमटे हे खटकेबाज संवादात आहेत; पण ते मनोरंजन अधिक करतात.
– – –

संतोष पवार याने ‘यदाकदाचित’पासून लोकनाट्यातील लवचिकता, उस्फूर्तता पुरती हेरली आहे. त्यावर त्याची पक्की हुकमत आहे. प्रासंगिक घटनांवर शालजोडीतला आहेर देण्यात त्याची लेखणी, अभिनय आणि दिग्दर्शन याची चांगली भट्टी जमते. अशा प्रकारच्या नाट्यलेखनात मध्यंतर चालत नाही. गाणारा गळा जसा बंद ठेवून चालत नाही, तसेच संतोषच्या नाटकाचेही ‘गणित’ आहे. म्हणूनच दोन वर्षांच्या ‘नाट्यगृहबंदी’नंतर एकदम त्याचीच चार नाटके रंगभूमीवर प्रगटली आणि प्रत्येक नाट्य हे वैशिष्ट्यपूर्ण! त्यातलं एक ‘हौस माझी पुरवा!’
सुंदरा मनामध्ये भरली; ही तर फॅमिलीची गंमत आहे; संगीत शोले ही त्याची नाटकेही सुरू आहेत. ‘एकाच महिन्यात एकाच लेखकाची चार नाटके, त्यातल्या तीन नाटकांत त्याची प्रमुख भूमिका’ हा एक विक्रमच यानिमित्ताने रंगभूमीवर घडतोय. त्याचे हे पन्नासावे नाटक आहे, जो राजकीय हसवणुकीचा बूस्टर डोसच ठरतोय.
शाहीर दादा कोंडके यांचा ‘विच्छा माझी पुरी करा’मधला शिपाई दादा आणि कोतवाल राम नगरकर, ‘शेराला भेटला सव्वाशेर’मधले काळू-बाळू, दादू इंदुरीकर यांच्या ‘गाढवाचं लग्न’मधला सावळा कुंभार प्रकाश इनामदार, गंगू- जयमाला, महाराष्ट्रशाहीर साबळे यांच्या ‘आंधळं दळतंय’ यातला गणपत हमाल सुहास भालेकर आणि पाटील बनलेले शाहीर – या दिग्गज जोड्या यापूर्वी रंगभूमीवर अवतरल्या. काही तर अगदी राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत पोहचल्या. मराठी मनावर या वगनाट्यांनी आणि त्यातील भूमिकांनी राज्य केले. त्यांची जादू आजही कायम आहे. ही वगनाट्ये नव्या रंगकर्मीनी पुन्हा-पुन्हा रंगभूमीवर आणली आहेतच. त्याच वाटेवरून जाणार्‍या ‘हौस माझी पुरवा’मध्ये संत्या-संतोष पवार आणि अंशू-अंशुमन विचारे हे हुकमी सोंगाडे रसिकांना आटपाट नगरीत घेऊन जातात आणि कुणालाही न दुखवता टोमणे, टपल्या, चिमटे, गुदगुल्या यांचा राजकीय खेळ रंगतो.
संत्या आणि अंशू हे जिवलग मित्र. मोठी स्वप्ने बघणारे. बिनधास्त. राज्याची सत्ता आपल्या हाती यावी, या हेतूने पुरते दिवस-रात्र झपाटलेले. किडकिडीत देहयष्टीचा राजा आणि गलेलठ्ठ राणी या दोघांना अद्दल घडविण्याचा ते बेत रचतात. कसंही करून या आटपाट नगरांची सत्ता मिळविण्यासाठी एकेक ‘खेळ’ खेळतात. त्यांची मैत्रीण सोनू ही देखील साथसोबत करतेय. हौस भागविण्यासाठी राजाला वेठीला धरतात. त्यात मर्कट राजा! चुकीचे सल्ले देऊन एकच गोंधळ उभा करण्यात ही तिघांची ‘टीम’ यशस्वी होत जाते. प्रशासन हादरते. जनता कंटाळते.
काळा पैसा गोळा करण्यासाठी डान्स बार, बियर बारला परवानगी द्यावी अशी युक्ती हे महाराजांना सुचवतात. हे नृत्य ‘सात्विक’ असेल असाही पर्याय पुढे करतात. पण मागल्या दाराने खुलेआम पहाटेपर्यंत हे नृत्य रंगते. फसवणूक होते. बारमध्ये येणारे ग्राहक पैसे उधळण्याची चढाओढ करतात. शाकाहाराऐवजी मांसाहारसक्ती करणारा निर्णय घेण्यास दोघेजण भाग पाडतात. लोकशाहीऐवजी हुकूमशाही अस्तित्वात आणण्याचा सल्ला देतात. सारेजण अरबी गेटअपमध्ये येतात. नाचगाणी, जीवघेण्या टोकाच्या शिक्षा सुरू होतात. या प्रसंगात शाहीर साबळे यांचे बोल आठवल्याखेरीज राहात नाहीत.
मराठी पाऊल मागे पडे
अरब पाहुणा घरात आला
उंट तयाने आत दडपिला
पाय पसरुनी चार दिशेला
मालक दारी रडे।।
घरात अमुच्या अमुची परवड
मानेवर परक्यांचे जोखड
हमाल कां नवसाचे बोकड
आम्ही इतरांपुढे,
मराठी पाऊल मागे पडे।।
बायकांची कामे पुरुषांनी आणि पुरुषांची कामे बायकांनी करण्याचाही ‘फर्मान’ काढण्यास भाग पाडतात. कपड्यांचीही सक्ती करण्यात येते. वैयक्तिक विषय शासकीय शक्तीचे होतात. समानतेचा गैर अर्थ लावण्यात येतो. शेवट निष्कर्ष लोकशाही सर्वश्रेष्ठ!
मूळ कथा निर्माते अजय विचारे यांची असून त्यांच्या वनलाइनवर संतोष पवारने सारा डोलारा रचला आहे. संहितेपासून ते सादरीकरण्यापर्यंत पदोपदी विडंबने आहेत, पण कुठेही मर्यादा ओलांडलेली नाही. राजकीय, सामाजिक कटुता कुशलतेने टाकली आहे. संवादलेखनात त्याचे पुरेपूर भान ठेवले असून कडू औषध गोड वेष्टनात गुंडाळून दिले आहे. एकेक प्रसंगात, खटकेबाज संवादात राजकीय टोलेबाजी आणि चिमटे आहेत; पण ते मनोरंजन अधिक करतात. कथा जरी राजा-राणीची, राजदरबारातली असली तरीही ती आजच्या ‘चालू’ परिस्थिती फिट्ट बसते. त्यातून अनेकांच्या टोप्या अलगद उडतात. ‘चिमटे’ आहेत त्यामुळे ‘जखमा’ होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेण्यात आलीय.
लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि अभिनय – असा चौफेर ‘प्रवास’ संतोषने यात केला असून ‘वन मॅन शो’ असल्याने त्यात कुठेही विस्कळीतपणा किंवा अडथळा नाही. लेखनात खटकेबाज, दिग्दर्शनातं गतिमान; नेपथ्यात सहा स्थळांची कल्पकता आणि अभिनयात हमखास हशे, टाळ्या यांनी नाटक परिपूर्ण आहे. एकूण पाच कलाकार असून अमोल सूर्यवंशी याचा राजा आणि प्राप्ती बने हिची राणी – हे दोघे परस्परविरुद्ध देहयष्टीची असल्याने त्यांची देहबोली रंगत वाढवते. राणीच्या जाडेपणावर एवढी विनोदनिर्मिती प्रथमच झाली असावी! हर्षदा बामणे हिला नृत्य आणि अभिनयाची उत्तम जाण आहे. तिनेही अनेक प्रसंगात लक्ष वेधले आहे. हे दोघेही कलाकार व्यावसायिकवर प्रथमच आले असून त्यांची समज नोंद घेण्याजोगी. अंशुमन विचारे या विनोदवीरासोबत संतोषचं ट्यूनिंग चांगलं जमलंय.
दोघांमधली ऊर्जा ही नाटकाची ताकद. टायमिंगवर उत्तम पकड असल्याने हक्काच्या टाळ्या, हशे वसूल होतात. अभिनयातील चपळता थक्क करून सोडणारी. एक से दो भले!
नाटकात नाच-गाणी आणि शृंगार आहे. तालासुरात प्रसंग बांधले आहेत, पण त्यात अतिरेक नाही. हा वेगळेपणा दिसतो. विविध वेशभूषा हे यातील आणखीन एक वैशिष्ट्या. मंगल केंकरे यांनी नाटकाचा पोत लक्षात घेऊन रंगत वाढवण्यासाठी चांगलं नियोजन केलंय. प्रसंगाप्रमाणे बदल करून चित्र बदलत ठेवलंय. शितल तळपदे यांची प्रकाशयोजना अनुरूप आहे. एकूणच तांत्रिक बाजू श्रीमंती थाटाच्या असून त्यात कुठेही तडजोड केलेली नाही.
एक दखल आवर्जून घेता येईल ती म्हणजे नाटकाच्या जाहिरातीत ‘मार्मिक’चे मुखपृष्ठकार गौरव सर्जेराव यांनी काढलेली बोचर्‍या प्रासंगिक घटनांवरील व्यंगचित्रे! जाहिरातीपासूनच त्यामुळे उत्कंठा वाढण्यास भाग पडते. हा प्रयत्न कौतुकास्पदच.
‘राजकारण’ हा मराठी माणसाचा वीक पॉइंट! कितीही नावं ठेवली, नाकं मुरडली तरी राजकारण कुठल्या दिशेला आहे, नेमकं काय घडतंय, याचा अंदाज नेहमी घेतला जातो. ही ‘हौस’ सत्तांतर घडवून आणण्यात कशी यशस्वी होते, याचा रंजक प्रवास रसिकांना सजगही करतोय. पण प्रवचनातून नव्हे तर निखळ मनोरंजनातून. रसिकांना दोन अडीच तास विश्वासात घेऊन हसविण्याची विलक्षण ताकदच त्यात दिसते.
वसंत सबनीस, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, आनंद यादव, शाहीर साबळे, दादू इंदुरीकर अशा अनेक दिग्गजांनी वगनाट्याची परंपरा संमृद्ध केली. त्या शैलीतले नाट्यलेखन कुठेतरी काळाआड जात असताना ‘सुंदरा मनात भरली’ किंवा ‘हौस माझी पुरवा’ यामुळे नवी आशा निर्माण होत आहे. अर्थात आजच्या परिस्थितीत बरेच बदल जरी असले तरीही त्याप्रकारचे लेखन होत असल्याचे समाधान आहे. चपखल संवाद, वेधक शैली, प्रतीकात्मकता, वाङमयीन मूल्य, हजरजबाबीपणा यांनी परिपूर्ण संहितेची प्रतीक्षा कायम असतेच.
महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणूस हा लाचार, बेकार उद्ध्वस्त होत असून त्याची पिछेहाट होत असल्याचे प्रभावी दर्शन हे महाराष्ट्रशाहीर साबळे यांनी ‘आंधळं दळतंय’ या मुक्त नात्यातून मांडले होते. त्यातील भूमिपुत्राची अवहेलना सुन्न करून गेली होती. मनोरंजन आणि अंजन त्यातून मिळाले. काळ बदलला. आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत रसिकांना जागं करण्याचा काहीसा प्रयत्न या नाटकातून होतोय. अगदी भोंग्यापासून ते ढोंगापर्यंत अन् डान्सबारपासून ते प्रार्थनेपर्यंत अक्षरशः धुडगूस घालणारे हे ‘पवार टच’ दोन अंकी व्यंगचित्र निश्चितच लक्षवेधी ठरेल!

हौस माझी पुरवा

लेखन/दिग्दर्शन/नेपथ्य – संतोष पवार
कथा संकल्पना – अजय विचारे
वेशभूषा – मंगल केंकरे
संगीत – रुपेश-नितीन
प्रकाश – शितल तळपदे
सूत्रधार – श्रीकांत तटकरे
निर्माता – अजय विचारे

[email protected]

Previous Post

धागे-दोरे

Next Post

भविष्यवाणी ४ जून

Next Post

भविष्यवाणी ४ जून

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.