हे व्यंगचित्र आहे ५ एप्रिल १९८१ या सालातलं. इंदिरा गांधी यांनी १९७५ साली आणीबाणी लादली होती. त्याचा फटका त्यांना १९७७ला बसला होता. त्या स्वत: निवडणूक हरल्या होत्या, इतकी वाईट अवस्था त्यांच्या पक्षाची झाली होती. मात्र, जनता पक्ष या कडबोळ्याचं काम झाल्यावर जनसंघाच्या पणतीने बरोब्बर ते कडबोळं कचर्याच्या डब्यात फेकून दिलं आणि भारतीय जनता पक्ष असा स्वत:चा नवा अवतार धारण केला. या खेळाला विटलेल्या भारतीय जनतेने इंदिराजींना पुन्हा निवडून दिलं होतं. त्यावेळी इंदिरा गांधींसमोर कोणकोणती आव्हानं होती, त्यातल्या किती आव्हानांचा सामना त्यांनी केला होता, कितींचा करायचा बाकी होता, हे सगळं या व्यंगचित्रातून दिसून येतं… त्यात कुठेही ना मंगळसूत्राची खेचाखेच आहे, ना मुजरा नृत्याची अदा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंदिराजी हाच काँग्रेसचा एकमेव चेहरा असतानाही त्या ऑफिसात बसून काम करत असत, निवडणुका नसतील तेव्हा परदेश दौरे आणि निवडणुका आल्या की पदाची कामं सोडून प्रचारमंत्री बनण्याचे प्रकार त्यांनी केले नव्हते… पाहायला जाल तर या व्यंगचित्रात बरंच काही दिसेल… बाळासाहेबांच्या समर्थ कुंचल्याने ते दाखवलं आहे, ते पाहण्याची दृष्टी आपल्याला कमावावी लागेल.