• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बहिणी जाणार सुप्रीम कोर्टात?

- टोक्या टोचणकर (टोचन)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 31, 2025
in टोचन
0

लाडक्या बहिणींना पैशाची लालुच दाखवून त्यांच्याकडून अडीच लाखांहून मतं उपटणार्‍या महायुती सरकारवर नाराज लाडक्या बहिणी सूड घेण्याच्या तयारीत असल्याची बातमी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याच्या कानावर आल्यापासून तो अस्वस्थ आहे. त्यातच महिला व बाल कल्याण मंत्री तसंच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री हे सगळेच परस्परविरोधी वक्तव्य करत असल्यामुळे या नाराज लाडक्या बहिणींच्या पदरी नक्की काय पडणार याचीही चिंता त्याला लागली आहे. त्यातच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातल्या त्यांच्या सत्कार समारंभात सांगितलं की राज्याच्या बजेटनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये पडणार असून त्यासाठी सरकारने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये महिला व बाल कल्याण विभागाकडे सुपूर्द केले आहेत. त्यामुळे सर्वच पात्र-अपात्र लाडक्या बहिणींच्या भुवया उंचावल्या आहेत. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भयानक ताण पडत असल्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येईल व त्यातील सुमारे अडीच लाख अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात येईल, त्याचबरोबर त्यांना आजपर्यंत मिळालेली रक्तम त्यांच्याकडून वसूल केली जाईल, असा इशारा अर्थमंत्री अजितदादांनी दिल्यामुळे हा घोळ यापुढे अधिक वाढत जाणार, असं पोक्याचं मत आहे. पैसे मिळणार नाहीत म्हणून अपात्र ठरणार्‍या नाराज बहिणी जो पवित्रा घेणार आहेत, त्याची कुणकुण लागल्यामुळे या योजनेचे मुख्य प्रणेते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या लाडक्या बहिणींबद्दल काय भावना आहे, हे जाणून घेण्यासाठी पोक्याने त्यांना भेटून त्यांची खास मुलाखत घेतली. तीच ही मुलाखत…
– नमस्कार एकनाथराव.
– जय जय मोदी… हर हर मोदी… घर घर मोदी. कसं काय येणं केलंस?
– तुमच्या लाडक्या बहिणींमुळे. ही योजना लवकरच बंद होणार असं ऐकलंय. या योजनेमुळे राज्याची तिजोरी रिकामी झालीय असं सारखं म्हणत असतात ते अजितदादा.
– मी ती योजना माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाने सुरू केली म्हणून आज ते दोघे सत्तेची उब घेताहेत. नाहीतर कुठल्या वळचणीत थंडीने कुडकुडत बसले असते याचा पत्ता लागला नसता. लाडक्या बहिणींमुळेच महायुती पुन्हा सत्तेत आली हे सार्‍या जगाला माहीताय आणि हे दोघे गरज सरो वैद्य मरो असा सूर आळवत बसलेत. माझ्या या लाडक्या बहिणी भडकल्या ना तर या दोघांना आणि महायुतीला कधी पायउतार करतील हे समजणारही नाही.
– पण हा पात्र-अपात्र बहिणींचा काय घोळ आहे? मुळात पैशाने उत्तम स्थितीत असलेल्या लाडक्या बहिणींच्या अर्जांची योग्य छाननी न करता सरसकट सर्वच बहिणींना तुम्ही या योजनेचा लाभ कसा काय दिलात?
– अरे पोक्या, हा लाभ दिला म्हणून तर महायुती सत्तेत आली ना? त्यासाठीच माझी धडपड होती.
– तरीही एकाअर्थी मतांसाठी लाच देण्याचाच प्रकार होता ना?
– मी तसं मानत नाही.
– पण त्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अपात्र लाडक्या बहिणींकडून दिलेली रक्कम काढून घेणार, असा इशारा दिलाय. या बहिणींनी येणार्‍या महापालिका, नगरपरिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुतीला मतं न देता सूड घेतला म्हणजे…
– मी त्याचीच वाट पाहतोय. मला आता सत्तेत काडीचाही रस उरलेला नाही. झाला तेवढा आणि होतोय तेवढा अपमान आणि पाणउतारा पुरेसा आहे. माझी बदनामी करून मला साइडट्रॅक करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न मला माहीताय. त्यामुळे मी स्वत:च त्यांना रामराम करून कायमचा माझ्या गावी जाणाराय. मग बसू दे बोंबलत.
– मला वाटतं, तुम्ही उपमुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालात की ते अजितदादांचा अडसर दूर करतील आणि तुमच्या व अजितदादांच्या जागी त्यांचं ऐकणार्‍या होयबांची नियुक्ती करतील. तुमच्या लाडक्या बहिणींना ते आणखी पैसे वाढवून देतील, जेणेकरून येणार्‍या निवडणुकीआधी पात्र आणि अपात्र बहिणींना पूर्वीच्या दुप्पट पैसे देऊन त्याचं श्रेय ते स्वत:च घेतील. म्हणूनच कोट्यवधींचा गुंतवणुकीचा करार करण्यासाठीच ते दावोसला आपल्या बगलबच्चांना घेऊन गेले होते ना!
– तू म्हणतोस त्यात तथ्य आहे. म्हणूनच तर त्यांनी दावोसमध्ये तीनशे एकवीस कोटींच्या गुंतवणुकीचा करार केलाय हे न समजण्याइतका मी वेडा नाही.
– ते सगळं खरं असलं तरी माझ्याकडे एक जबरदस्त ब्रेकिंग न्यूज आहे.
– कोणती रे बाबा?
– ज्या अडीच लाख लाडक्या बहिणी खोटं उत्पन्न दाखवून अपात्र ठरवल्या जाणार आहेत, त्या एकमेकींच्या संपर्कात असून त्यांच्यावर झालेल्या तथाकथित अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी त्या सुप्रीम कोर्टात खटला दाखल करणाराहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की महायुतीला तेव्हा आमच्या मतांची गरज होती म्हणून त्यांनी आमचे अर्ज न तपासताच आम्हाला त्या योजनेचा लाभ घेऊ दिला. म्हणून तर आम्ही महायुतीच्या उमेदवारांना मतं दिली. आता आमच्या अर्जांची छाननी करून आम्हाला या योजनेतून बाद ठरवताहेत ते. हे म्हणजे वरातीमागून घोडे असल्यासारखं आहे. यात आमची चूक नाही. तुम्ही आम्हाला पैसे दिले, त्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला मतं दिली आणि फिट्टंफाट केली. आता तुम्ही आम्हाला बाद ठरवून आम्हाला आजपर्यंत दिलेली रक्कम परत मागणार असाल तर आम्ही दिलेली अडीच लाखांवर मतंही आम्हाला परत द्या. ती प्ारत देऊ शकतील का, असा सवाल आम्हाला सुप्रीम कोर्टाला विचारायचाय. जे या लाच देऊन मतं मागणार्‍या घोटाळ्यात सामील असतील त्या सर्वांवर कठोर कारवाई करा, ही त्यांची मागणी असेल. तुम्हीसुद्धा सुटणार नाही यातून. आता बोला!
– काय बोलणार! तुका म्हणे गप्प राहावे, जे जे होईल ते ते पहावे!

Previous Post

राशीभविष्य

Next Post

नाय, नो, नेव्हर…

Next Post

नाय, नो, नेव्हर...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.