• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आमचा पंचाक्षरी मंत्र!

- दिलीप मालवणकर

Nitin Phanse by Nitin Phanse
January 31, 2025
in गर्जा महाराष्ट्र
0

बाळ ठाकरे या पंचाक्षरी मंत्राने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदुस्तानला पाच दशके व्यापून टाकले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नावच इतके प्रभावी आहे की, कोणीही त्यापुढे नतमस्तक व्हावे.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनंतर हिंदुत्वाचा उघड पुरस्कार कोणी केला असेल तर ते म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच. बाळासाहेब हे खरेच एखाद्या सम्राटासारखे वागले आणि अखेरपर्यंत जगलेसुद्धा! महाराष्ट्राची आराध्य दैवते म्हणून भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज हीच होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने हिंदुत्ववादी जनतेत त्यांनी दैवताइतके स्थान प्राप्त केले; ते त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी, अढळ निष्ठेने व असीम त्यागामुळे ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले!’ असे संतवचन आहे. राजकारणात राहूनही हे वचन तंतोतंत पाळणे ही अशक्यप्राय बाब, परंतु बाळासाहेब शब्दाचे पक्के होते. एकदा एक वाक्य उच्चारले की, त्यावर ते ठाम असत. मग ते कोणत्याही परिणामांची तमा बाळगत नसत.
त्यांनी ओठावर एक आणि पोटात एक असा राजकीय दुटप्पीपणा कधीही केला नाही. हिंदुत्वाचा पुरस्कार करताना मतांचे राजकारण केले नाही. किंवा राजकीय नफा-नुकसानीचे गणित मांडले नाही. मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी परप्रांतीयांशी पंगा घेऊन मराठी माणसांची अस्मिता जपली, जोपासली व वृद्धिंगत केली.
पाकधार्जिणे मुस्लिम असोत की लाल बावटेवाले कम्युनिस्ट असोत की ढोंगी राजकारणी असोत, त्यांच्याबद्दल बाळासाहेब जी भूमिका घेत त्याबाबत ते ठाम असत. म्हणूनच ते निश्चयाचे महामेरू होते. महाराष्ट्रातील भूमिपुत्र मराठी माणसांवरील अन्यायाविरोधात रणशिंग फुंकून ते ‘बहुतजनांसी आधारू’ झाले. या लोकशाहीतही शिवशाहीस आदर्श मानून शिवशाहीचा ध्यास घेऊन त्यांनी अल्पकाळासाठी का होईना, ती प्रत्यक्षात आणली. म्हणूनच ते आधुनिक ‘जाणता राजा’ होते.
मी माझ्या वयाच्या १७व्या वर्षापासून बाळासाहेबांना पाहत/ऐकत आलो आहे. दसरा मेळावा ही तर आम्हा शिवसैनिकांसाठी बाळासाहेबांचे ज्वलंत विचारांचे सोने लुटण्याची पर्वणीच असे. त्यांच्या विचारांचे सोनं लुटत लाखो तरूण रिचार्ज होऊन कार्यरत होत. महाराष्ट्रावर भगवा ध्वज डौलाने फडकत ठेवणारे महापुरुष म्हणजेच बाळासाहेब ठाकरे! बाळासाहेबांची दसरा मेळाव्यातील भाषणे ऐकण्यासाठी मी दरवर्षी हमखास शिवतीर्थावर जात असे. एका वर्षी दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचे भाषण सुरू होताच, धो धो पाऊस सुरू झाला होता. तरीही जमिनीवर मांडी घालून बसलेले शिवसैनिक जागचे हालले नाहीत. वरून धो धो पाऊस पडतोय व व्यासपीठावरून बाळासाहेब शब्दांचे अंगार फुलवत होते. भर पावसात चिखलात बसून शिवसैनिक बाळासाहेबांचे विचार कानात प्राण साठवून ऐकत होते. त्यात मीही होतो. असा अलौकिक नेता माझ्या तरी पाहण्यात नाही.
बाळासाहेब हे प्रथम जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार होते. त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा लाभला होता. मार्मिक या साप्ताहिकातून ‘वाचा आणि गप्प बसा!’ या सदरातून त्यांनी मरगळलेल्या मराठी मनांवर फुंकर घालून चैतन्य निर्माण केले. त्यातूनच १९ जून १९६६ रोजी शिवसेना ही मराठी माणसांच्या संघटनेचा जन्म झाला. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कच्या मैदानावर मार्मिककार व नामवंत व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांची पहिली सभा ‘न भूतो…’ अशी झाली. प्रस्थापित राजकारणी व प्रसिद्धीमाध्यमांचे डोळे दिपवून टाकणारी ही पहिली जाहीर सभा झाली. दोन लाखांहून अधिक जनसागर उसळला होता. लोक आश्चर्याने चकित झाले होते. असा मेळावा यापूर्वी कधीच झाला नव्हता. शिवाजी पार्क माणसांनी फुलून गेला होता. बाळ ठाकरे या व्यक्तीला पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी लाखो माणसं आतुरली होती. या प्रसंगी बाळासाहेबांनी तासभर केलेले भाषण मंत्रमुग्ध करणारे होते.
१९७९ सालची घटना आहे. बाळासाहेब खूप आजारी होते. सर्व शिवसैनिक चिंतित होते. मातोश्रीवर रीघ वाढत चालली होती. त्याही अवस्थेत बाळासाहेब बाहेर डोकावले आणि त्यांनी हात हलवून शिवसैनिकांना अभिवादन केले. नंतर त्यांनी मार्मिकमध्ये ‘आम्ही बरे आहोत!’ हा लेख लिहून शिवसैनिकांना दिलासा दिला. या लेखात बाळासाहेबांनी शिवसैनिकांबद्दल जे प्रेम व्यक्त केले व आत्मीयता दाखवली ती शब्दातीत होती. इतके निखळ प्रेम नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांत पाहायला मिळणे दुर्मीळ बाब आहे.
१९६६च्या सभेतील बाळासाहेबांचे शब्द आजही आठवतात. ‘लोकशाहीने प्रश्न सुटणार नसतील तर ठोकशाही स्वीकारणे भाग पडेल. आम्हाला सर्वत्र मराठीच पाहिजेत. येथील गुंडही मराठीच हवेत. हातभट्टीवालाही मराठीच असला पाहिजे.’ याच सभेत प्रबोधनकार ठाकरे कडाडले होते, ‘झगडल्याशिवाय काही मिळत नाही. सामोपचाराच्या गोष्टी गांडूंनी कराव्यात.’ तमाम मराठी माणूस एकवटल्याचा त्यांनी आनंद व्यक्त करून ‘माझा बाळ मी महाराष्ट्राला दिला’ अशी घोषणा केली होती.
बाळासाहेबांचे विचार हे शिवधनुष्य आहे. ते आचरणात आणणे हे येर्‍या गबाळ्याचे काम नाही. दिल्लीच्या सत्ताधीशांनाही मातोश्रीशिवाय पर्याय नसे. दुसरे बाळासाहेब होणे नाही. त्यांच्यासारखा परखडपणा, त्यांच्यासारखे डॅशिंग नेतृत्व, अजातशत्रुत्वाची हाव नसलेले, आपल्या ध्येयाशी एकिनष्ठ राहून कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारे नेतृत्व, शिवसैनिकांवर पुत्रवत प्रेम करून त्यांचा आदर राखण्याचा स्वभाव, करडी शिस्त, संघटनशक्ती आज कोणातही नाही. असे अमोघ नेतृत्व आपल्याला लाभले हेच आपले अहोभाग्य!

Previous Post

इम्पॉर्टंट सवाल पूछते रहो…

Next Post

बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप, ईव्हीएमवर मात्र सुपरहिट?

Next Post

बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप, ईव्हीएमवर मात्र सुपरहिट?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.