बाळासाहेबांनी हे मुखपृष्ठचित्र रेखाटलं होतं २० जानेवारी १९७४च्या अंकासाठी… त्या काळात शिवसेनेचा, म्हणजे अर्थातच शिवसेनाप्रमुखांच्या मते तेव्हाचे कम्युनिस्ट नेते, त्यांचा पक्ष हे देशद्रोही होते (जगभरातले कष्टकरी एक आहेत, त्यापुढे देश दुय्यम आहेत, अशी सर्वसाधारण मांडणी होती साम्यवाद्यांची, त्यामुळे त्यांच्या राष्ट्रनिष्ठेविषयी कायम संभ्रम असायचा, तो कायम राहील, अशी त्यांची काही धोरणे असायची). त्यामुळे ते कम्युनिस्टांवर प्रखर टीका करायचे, व्यंगचित्रांमधूनही जोरदार फटकारे मारायचे. या व्यंगचित्रातही मतदारांनी राष्ट्रवादाच्या हातात विळा हे कम्युनिस्ट हत्यार दिलेलं आहे, असं चित्रण केलं आहे. त्या काळात बंगाल, केरळ, त्रिपुरा यांच्यासारखी मोजकी राज्यं सोडल्यास देशात इतरत्र कुठेही साम्यवादी विचारांना फारसा थारा नव्हता आणि त्यांचं प्राबल्यही नव्हतं. तरीही देशाला अस्थिर करणार्या आणि फुटीरतेकडे नेऊ शकणार्या विचारांना बाळासाहेबांनी तीव्र विरोध केला होता. आज देशाची संघराज्यात्मक रचना, संविधानिक रचना उद्ध्वस्त करायला निघालेल्या आणि सर्व प्रकारचा खोटेपणा करून, नीच खेळ खेळून निवडणुका जिंकून लोकशाहीच हायजॅक करायला निघालेल्या भारतीय जनता पक्षाचा कारभार पाहून बाळासाहेबांना संताप अनावर झाला असता. त्यात आपण सांगू तो देशभक्त, बाकीच्यांनी पाकिस्तानात जावे, हा खाक्या पाहिल्यावर मतदारांनी कोणत्या विद्रट कार्ट्याच्या हातात राष्ट्रवादाचे हत्यार दिले आहे, ते दाखवणारे चित्र रेखाटले असते.

