१२ जून १९७७ या तारखेच्या अंकाचे हे मुखपृष्ठचित्र. जनता पक्षाच्या राजवटीचा हा कालखंड. इंदिरा गांधी यांच्या काळात, विशेषत: आणीबाणीमध्ये प्रचंड जुलमी कारभार झाला, महागाई शिगेला पोहोचली, अशा प्रकारचा प्रचार करुन इकडून तिकडून गोळा झालेल्या नेत्यांची मोट बांधून तयार झालेला हा पक्ष. मोठ्या अपेक्षेने जनतेने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसेतर पक्षांवर विश्वास टाकला होता. पण यांच्यात आवळ्या भोपळ्यात असतं तेवढंच सख्य होतं आणि कारभाराचा गंध नव्हता. त्यात देशात महागाईचा वारू बेलगाम सुटला आणि मोहन धारिया हे अन्न पुरवठा मंत्री महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू लागले. त्यांची एकंदर स्थिती इथे दिसतेच आहे आणि त्या स्थितीतही त्यांचा वारू काबूत असल्याचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे… काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे, रुपयाच्या अवमूल्यनाचे, गॅस, इंधन महागाईचे आरोप करून सत्तेत आलेले मोदी सरकार मात्र भाग्यवान खरे. त्यांच्या काळात यातली प्रत्येक गोष्ट आणखी बिघडली. नोटबंदीसारख्या निर्णयांनी देशाचं कंबरडं मोडलं. इराण युद्धात आपली कातडी वाचवण्यासाठी नेत्यांनी इस्रायलची तळी उचलण्याची घोडचूक केल्यामुळे देशात गॅस, इंधनाची टंचाई आणि महागाईचा प्रकोप होण्याच्या बेताला आहे. पण, जनतेला फिकीर नाही. ती नोटबंदीला मास्टरस्ट्रोक ठरवणारा धुरंधर रांगा लावून पाहते आहे आणि खरात फाइल्सच्या क्लिपा डोळे फाडफाडून पाहते आहे… महागाईकडे पाहायला तिला वेळ कुठे आहे?

