संविधानदिनी सर्व देशाभिमानी एकत्र येऊन संविधानाप्रति आदर व्यक्त करतात, कार्यक्रम राबवितात. मात्र अर्ध्या विजारीतून पूर्ण विजारीत आलेली मंडळी यात कुठेच दिसत नसतात. याचे कारण काय असावे बरे?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव, पुणे
याला नेहरूच कारण असतील, कारण विजार अर्धी घाला, पूर्ण घाला किंवा घालू नका.. धडावरचं डोकं जर तेच असेल आणि त्या डोक्यातले विचार ‘तेच’ असतील आणि नेहरू ते विचार बदलू शकले नसतील, तर कोण जबाबदार असणार? वाटल्यास विचारा तुम्ही म्हणताय त्या विजारवाल्यांना!
मी मटका अ़ड्ड्यावर धाड टाकण्याचा देमार स्टंट करून दाखवू शकतो, अल्पसंख्याकांबद्दल विखारी बोलण्यामध्ये तर माझी जीभ कोणीच धरणार नाही. माझ्या हातावर ‘मेरा बाप कोंबडी चोर है’असे पर्मनंट गोंदवलेले आहे. पोलिसांच्या कुटुंबियांबद्दल अवमानकारक बोलण्यामध्ये माझा हातखंड असून मला बोकड व वृक्ष यातील फरक ढिम्म कळत नाही. माझ्या या योग्यतेचा सारासार विचार करून
‘सागर’बंगल्यावर बसलेला आमचा बाप म्हणजे आदरणीय देवाभाऊ हे मला मंत्री करतील काय?
– सदा कोकणे, पनवेल
आधी आपल्या खर्याखुर्या बापाची योग्यता पाहावी लागेल. (सध्या बापाने मुलांना मंत्री बनवण्याचा ट्रेंड चालू आहे म्हणून म्हटलं… आणि बाप हा शब्दप्रयोग आमचा नाही… काही नाही उद्या आम्ही म्हटलेलं अंगाशी आलं तर आम्हाला वाचवायला तुम्ही म्हणताय तसा असा आमचा दुसरा कोणी बाप कुठल्या बंगल्यावर बसलेला नाहीय… म्हणून क्लिअर केलं.
ठाकरे बंधू एकत्र आले ते मुंबईच्या, मराठी माणसांच्या हितासाठी नाही, तर सत्तेसाठी, असं महायुतीच्या नेत्यांचं तर्कट आहे. हे लोक इकडून तिकडून माणसं गोळा करून, लांड्यालबाड्या करून निवडणुका चोरतात ते कशासाठी?
– सुनीता पिंगळे, कळमनुरी
हल्ली जे काही होतं ते धर्मासाठी असतं आणि जे धर्मासाठी नसतं ते सगळं विकासासाठीच असतं. आता हे वरवरचं उत्तर आहे असं जरी वाटलं तरी जास्त खोलात शिरू नका, बुडबुडे येतील आणि तुमचा विकास होता होता मध्येच थांबेल.. आणि मग तुम्हाला सुद्धा तुमच्या विकासासाठी आता ज्यांना शिव्या घालताय त्यांच्याशीच जुळवून घ्यावं लागेल.
बेडकी फुगून बैल होत नाही, असं म्हणतात. पण, भारतीय जनता पक्षाने तर पक्ष फोडून, उमेदवार पळवून आपल्या पक्षाचा आकार अवाढव्य केला आहे. बैल बनू पाहणार्या बेडकीचं शेवटी काय झालं, हे यांना कळत नसेल का?
– अझीम शेख, सातारा
होऊन गेलेल्या इतिहासात आपल्या पूर्वजांच नाव नोंदलं जावं म्हणून इतिहासच बदलू पाहणारे, ईसापनीतीमधली बेडकीची गोष्ट बदलून, बेडकीऐवजी आपल्या पक्षाचं नाव घेतलं जावं असा प्रयत्न करत असतील… पण हे तुम्ही का विचारताय? तुमच्या पक्षातलं कोणी तिकडे गेलं आहे? की तुमच्या पक्षात कोणी यायला मागत नाही आहे? फार त्रास करून घेऊ नका.. अति तिथे माती, करावे तसे भरावे, नियतीचा न्याय या इसापनीतीमधल्या इतर गोष्टी ‘त्यांनी’ वाचल्या नसतील, पण तुम्ही वाचा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाताळनिमित्त चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात आणि त्याचवेळी त्यांच्या परिवाराशी संबंधित संघटनांचे लोक नाताळचे कार्यक्रम उधळून लावतात, सजावटी तोडून टाकतात आणि पोलिस यंत्रणा ढिम्म हलत नाही, कोणतंही राज्य सरकार काही कारवाई करत नाही. यातून यांना नेमकं काय सांगायचं आहे ख्रिस्ती समुदायाला?
– डॅनियल परेरा, विरार
ना सुधरूँगा ना सुधारूँगा… असं मोदीजींना सांगायचं असेल असं त्यांच्या विरोधकांना वाटत असेल… तर तुम कुछ भी करो मैं हूँ ना.. असं मोदीजींना सांगायचं असेल… असं तोडफोड करणार्यांना वाटत असेल… तर, हे तोडफोड करणारे काय करत आहेत हे त्यांच त्यांना कळत नाहीय… त्यामुळे मी त्यांना माफ करणार आहे… असं बोलून ईश्वराच्या प्रेषिताने त्यांना मारणार्यांना माफ केलं होतं तसं… असं मोदीजींना सांगायचं असेल… असं ख्रिस्ती समुदायाला वाटत असेल… आणि आपल्याला काय वाटतं हे सांगायची सोय नाही… म्हणून मी काही बोलत नाही असं मोदीजींना सांगायचं असेल… असं मला वाटतं… (पण आम्हाला काय वाटतं हे आपल्यात ठेवा. कारण जिथे मोदीजींना बोलायची सोय नाही, तिथे तुमची आमची किती गैरसोय आहे, हे वेगळं सांगायची गरज आहे??)
