आज आपल्या आयुष्यात गुगल नसते, तर आपले आयुष्य कसे झाले असते?– अशोक परशुराम परब, ठाणे
आम्हाला काय विचारता? गुगल बंद करा, वापरू नका आणि मग बघा… गुगल नसते तर लोकांनी स्वतःच मार्ग तरी स्वतः शोधला असता… उत्तर इंटेलेक्च्युअल वाटलं तरी ज्यांना हसण्यावारी न्यायचं ते हसण्यावारी नेऊ शकतात.
नोटबंदी हा मास्टरस्ट्रोक होता अशी चमचेगिरी करणारा सिनेमा नोटबंदीच्या वेळी एटीएमच्या, बँकेच्या रांगेत उभे राहिलेले, छोटे धंदे पडल्याने दिवाळे निघालेले किंवा नोकरी गमावलेले प्रेक्षक सुपरहिट कसे करू शकतात?- अक्षय शेळके, जालना
मी मूर्ख बनलो किंवा मला कोणी मूर्ख बनवलं असं कोणी कबूल करतो का? गिर गया तो भी टांग उपर अशी एक कहावत आहे आपल्याकडे ती काही उगाच नाही…
गॅसटंचाई झाल्यामुळे ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, ज्यांची हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे, ज्यांच्यावर कोळशाच्या शेगड्या पेटवण्याची वेळ आली आहे, ते एक दिवस वेळ ठरवून बाहेर पडून टाळ्या थाळ्या का वाजवत नाहीत सगळे मिळून? – नीता पावसकर, रत्नागिरी
सामान्य मानव आयडिया सुचायच्या थांबल्या, तर जुन्या आयडिया रिपीट करतो पण… महामानव असेल तर तो जे जे करेल ती ती आयडिया असते… ती रिपीट होत नसते. कारण एका आयडियाने लोक मूर्ख बनले आहेत, ते परत त्याच आयडियाने मूर्ख बनत नाही हे त्याला पक्कं ठाऊक असतं… थोडा विश्वास ठेवा, नवीन आयडियाची वाट बघा, महामानवांकडे आयडियाची कमी नसते.
सध्या सुरू असलेलं युद्ध थांबवण्याची क्षमता फक्त भारतात आहे, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात. आपल्याला साधा गॅस, तेल कुणाकडून घ्यायचं ते अमेरिकेला विचारून ठरवावं लागतं आणि भागवतांना हे शोध कुठून लागतात?- विश्राम पाटील, सांगली
नवीन शोधावर जाऊ नका. आपले स्वयंसेवक तीन दिवसात युद्ध संपवू शकतात हा जुना शोध तुम्ही विसरला असाल, पण शोध लावणारे विसरलेले नाहीत. त्याच स्वयंसेवकांच्या ताकदीवर त्यांनी हा नवीन शोध लावला असावा. स्वयंसेवकांच्या ताकदीला अंडरएस्टिमेट करू नका… फक्त युद्ध तीन दिवसांत त्यांनी संपवलं तर मग तुम्ही, आम्ही, चॅनलवाले, पेपरवाले चर्चा कशावर करणार? म्हणून बोलणारे फक्त बोलत असतील… युद्ध थांबवत नसतील.
माझा मित्र गण्या म्हणतो की सगळ्या देशाने एक दिवस सगळा दिवसभर फाफडा, ढोकळा, खमण, पात्रा वगैरे खाल्ला तर देशातली सगळी गॅसटंचाई गायब होईल कायमची. तुमचं काय मत आहे?- प्रथमेश पाटील, पनवेल
दुसर्या कुठल्या गोष्टीवर लोक बोलू शकतात? लोकांनी नेहमी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायचा का? लोक गॅसटंचाईवर बोलता येतं तर बोलू दे की. समजा गॅसटंचाई गायब झाली आणि लोकांनी चर्चेसाठी, बोलण्यासाठी, दुसरी कुठली फाईल शोधली, तर फाफडा ढोकळा खमण खाणार्यांनी करायचं काय, त्यांनी गॅसवर राहायचं काय? की ती चर्चा थांबवण्यासाठी युद्धच ओढवून घ्यायचं. इथे तीन पाहुण्यांच्या मारामारीत साप मरतोय ना… ते बघा, गॅसटंचाईमुळे काय प्रॉब्लेम होतायत ते बघू नका.
हिंदू महिलांवर अत्याचार करणारे, त्यांच्याशी विकृत चाळे करणारे एकापेक्षा एक नराधम भोंदू बाबा, बुवा सापडत आहेत, त्यांचे गलिच्छ कारनामे सगळं राज्य पाहतंय आणि आपल्याकडचे सतत मुसलमानांवर आग ओकणारे हिंदू धर्मरक्षक छोटे जवान मात्र तोंड उघडायला तयार नाहीत. अशाने हिंदूंचं रक्षण व्हायचं कसं? – अस्मिता पडळकर, भायखळा
तुमच उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलेलं आहे… तुम्ही म्हणताय ते धर्मरक्षक ज्यांच्या कारनाम्यांवर तोंड उघडायला तयार नाहीत… ते कोण आहेत? ते बघा… मग कळेल की त्यांच्याविरुद्ध तोंड न उघडून, मुसलमानांवर आग ओकणारे कोणाच रक्षण करतायत ते… बाकी तुम्ही समजून घ्या… जास्त काही लिहायला लावू नका. नाहीतर, प्रश्न विचारणारा राहील बाजूला आणि उत्तर देणार्याविरुद्ध आग ओकायला सुरुवात होईल…
आठ मार्च रोजी झालेला आंतरराष्ट्रीय महिला दिन तुम्ही कसा साजरा केलात संतोषराव?-विकास घाटगे, जळगाव
प्लीज वैयक्तिक प्रश्न नको ना. आम्ही तुम्हाला विचारलं का कामगार दिन कसा साजरा करता? झाकली मूठ सव्वा लाखाची असते. ती तुमचीही असू देत. आमचीही राहू देत. महिलांच्या दृष्टीने पुरुष इथून तिथून सारखेच… बाकी अशा खास दिवशी कोणी विम बार वापरून भांडी घासतात, कोणी पितांबरी वापरतात, पण सोशल मीडियावर महिला दिनाच्या शुभेच्छा आवर्जून देतात. आम्हीही आवर्जून दिल्या…
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या[email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

