कांजुरच्या मेट्रो कारशेडवरून थयथयाट केला जातोय. मी अहंकारी आहे म्हणताहेत. होय, मी आहे अहंकारी…मी माझ्या मुंबईकरांसाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी मी जरूर अहंकारी आहे, असा जोरदार पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांवर केला. मेट्रो कारशेडसाठी केवळ मेट्रो-3 साठी असलेली आरेची जागा बदलून मेट्रो 3, 4 व 6 या तिन्ही लाइन होऊ शकतील अशी कांजुरमार्गची जागा निवडली. मग केवळ एका मेट्रो लाइनसाठी ‘आरे’त कारशेड हवीच कशाला?, असा बिनतोड सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केला.
आम्ही तुम्हाला श्रेय द्यायला तयार आहोत!
जो काय वाद चाललेला आहे तो राज्य पिंवा जनतेच्या हिताचा नाही. तुमचे प्रकल्प आम्ही अडवायचे, आमचे प्रकल्प तुम्ही अडवायचे. मग जेव्हा पाच वर्षे पूर्ण होतील तेव्हा काय केलं, तर काही केलं नाही, अडवाअडवी केली. हा कद्रूपणा आहे. हा कद्रूपणा सोडायला हवा. माझं विरोधी पक्षाला आवाहन आहे, चला या, आम्ही तुम्हाला याचे श्रेय द्यायला तयार आहोत की, तुम्ही कांजुरच्या मेट्रो कारशेडच्या प्रकल्पासासाठीच्या जागेचा हा प्रश्न सोडवा. इथे माझ्या इगोचा विषय नाही. आपण जनतेच्या सेवेसाठी सत्ता मागत असतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना, विकास प्रकल्प तसेच मेट्रो कारशेडच्या वादाबाबत राज्यातील जनतेशी संवाद साधला. मेट्रो कारशेडसाठी कांजुरमार्गची जागा का निवडण्यात आली हे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चर्चेचे आवाहनही केले. मुख्यमंत्री म्हणाले, आरेमध्ये आपण पर्यावरण वाचवले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची व्याप्ती वाढवून 800 एकरचे जंगल केले. जगातलं शहरात जंगल असलेलं हे एकमेव उदाहरण. आरेतील 25 आणि 5 अशी 30 हेक्टर जागेऐवजी कांजुरमध्ये 40 हेक्टर जागा आहे. कांजुरच्या त्या जागेवर गवताळ, ओसाड प्रदेश आहे. केवळ मेट्रो-3 ची कारशेड नव्हे, तर मेट्रो 3, 4 आणि 6 या तीन लाइनची कारशेड तिथे करू शकतो. या दोन्ही जागांचे पर्यावरण आणि एपूण जागा यात थेट फरक असल्याचेच उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर आणले.
आरे कारशेडसाठी 30 हेक्टर जागा घेतली. यातील पाच हेक्टरमध्ये घनदाट जंगल असणार म्हणून ती वापरणार नाही हे लिहून घेतले. जर ती जागा वापरणार नव्हतात, तर प्रकल्पात घेतलीच कशाला? म्हणजे असं, 25 हेक्टरची जागा जिचे काम 2023 पर्यंत पूर्ण होणार. ती जागा पुढे कमी पडणार, मग पाच हेक्टरमधील ती झाडं कापा, ती जागा घ्या. ती जागा घेतल्यानंतर 2031 पर्यंत ती कमी पडणार. मग आणखी घ्या. म्हणजे जंगल मारत मारत खतम करायचं आणि तिकडे फक्त एका लाइनसाठी कारडेपो करायचा? असा सवाल करताना जंगल संपवण्याचा डाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उघडा पाडला. मेट्रोच्या पिकअवरमधील अतिरिक्त गाडय़ांसाठी हव्या असलेल्या स्टेबलिंग लाइनचाही प्रस्ताव आधीच्या प्रकल्पात नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही स्टेबलिंग लाइन आता आरेच्या कोपऱयावर जिथे कास्टिंग यार्ड आहे तिथे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जनतेची जागा उपयोगात आणत असू तर खेचाखेची कशाला करायची?
कांजुरमार्गची जागा योग्य असताना दुर्दैव असं की, आपल्याविरोधात कोर्टात कोण गेलं, तर केंद्र सरकार, सॉल्ट कमिशनर. पण ही खेचाखेची कशासाठी करताय? जर का खेचाखेची करायचीच असेल तर केंद्राचा जो बुलेट ट्रेन प्रकल्प आहे त्यासाठी राज्याची मोक्याची जागा, ज्याचा उल्लेख जगातला सर्वात महागडा भूखंड असा होऊ शकेल असा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सचा भूखंड आपण बुलेट ट्रेनला दिला. त्यावरचं इंटनॅशनल फायनान्स सेंटर इतर राज्यात नेलं. आम्ही खळखळ नाही केली. त्या बुलेट ट्रेनला विरोध होतोय, वाढवण बंदराला विरोध होतोय. त्या शेतकऱयांना मी भेटलो. शेतकऱयांना नुसतं अडवून ठेवायचं, त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारायचे हे नाही चालणार. ही लोकशाही नाही. त्यांना मी भेटतोय, बोलतोय, परंतु ज्या ज्या वेळा इतर केंद्राचे प्रकल्प येतात तेव्हा आपण खळखळ न करता जमीन देतो, मग कांजुरची जागा भले केंद्राची असेल नसेल, त्याचा वाद आपण सोडवू शकत नाही का, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
माहुल पंपिंग स्टेशनची जागा केंद्राने अद्याप का मंजूर केली नाही?
पावसाळय़ात बातम्या येतात, मुंबईची तुंबई झाली. हे आता घासून घासून खूप गुळगुळीत झालेय. हे मान्य केलं पाहिजे की, मुंबईची भौगोलिक रचना ही समुद्रसपाटीपासून काही ठिकाणी खाली आहे. अतिवृष्टीच्या वेळी भरती असली की मुंबईचं पाणी समुद्रात जाण्याऐवजी समुद्राचं पाणी मुंबईत येतं हे सत्य आहे. या सत्याला सामोरे जाताना जी पंपिंग स्टेशन्स करतो आहोत. त्याचा उपयोग हे भरतीच्या वेळचं पाणी गेट बंद करून थांबवून शहरातलं पाणी पंपाद्वारे समुद्रात टाकण्यासाठी आहे. ही पम्पिंग स्टेशन करताना माहुलच्या पम्पिंग स्टेशन जिथे होणार आहे ती जागा मिठागराची आहे. राज्याच्या वतीने महापालिकेच्या वतीने मीसुद्धा केंद्रात बोललो आहे की, आम्हाला ही जागा द्या. मुंबईकरांना पूरमुक्त करायचं आहे. पण निर्णय येतो आहे अजून. जागा मिळणार, त्यानंतर टेंडर निघणार, मग पम्पिंग स्टेशन होणार. कशासाठी हा विलंब, कोणसाठी आपण हे करत आहोत, असा थेट सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
या प्रकल्पांचे काय झाले?
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या काळात खर्च वाढलेल्या तसेच रखडलेल्या प्रकल्पांची माहितीच दिली. ते म्हणाले, अमरावती लोअर पेढी सिंचन प्रकल्प होता. या प्रकल्पाचा खर्च 2008-09 साली 500 कोटी होता. तो 2014-15 साली 1600 कोटी झाला. आता मुख्य कालव्यावर 111 कोटी खर्च झाल्यानंतर पाइपमधून पाणीपुरवठा केला पाहिजे हे लक्षात आल्यानंतर ते काम बंद करून पाइपलाइनच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू झाला. म्हणजे सुरुवातीला जे वाटलं होतं ते अर्धवट राहिलं आणि नवीन वाटलं हे हिताचं आहे ते करण्यात आलं. त्याचप्रमाणे तापी धरण प्रकल्पातील दरवाजांचे काम कसे वाया गेले हेही मुख्यमंत्र्यांनी तपशीलवार सांगितले. यावेळी वांद्रे-कुर्ला येथील आता तोडाव्या लागलेल्या स्कायवॉकचेही उदाहरण त्यांनी दिले.
घाईघाईत केलं म्हणजे विकास होतोच असं नाही
जे हिताचं आहे ते करणं हे सरकारचं काम आहे. घाईघाईत काही तरी केलं म्हणजे विकास होतोच असं नाही. काही वेळा आपण येताजाताना रस्त्यात वाचतो, अति घाई संकटात नेई. तेव्हा अति घाई करणं हे योग्य नाही. हा विकास आतापुरता नसून पुढील काळासाठी हवा. काही प्रकल्प फसले, कारण त्यावेळी प्लानिंग नव्हतं, करायचं म्हणून केलं, नारळ पह्डले. यात विकास नाही. यात वेळ जातो, पैसाही जातो, प्रगतीसुद्धा अडते. जे काही आपण करू ते विचार करून समजून करू. भावी पिढय़ांच्या भवितव्याचा विचार करून करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
जनतेच्या हिताचं आहे तेच करणार, हट्ट न करता पाठपुरावा करणार!
मी तुमच्याशी संवाद साधताना आपल्या घरातला मोठा भाऊ, आपला कुटुंबीय बोलतोय असे तुम्हाला वाटते. मी तेच नातं हे कायम ठेवू इच्छितो. मी जे आपल्याशी बोलतो ते एक शब्द खोटा बोललेलो नाही आणि बोलणार नाही. तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं काही करणार नाही. कारण मी ज्या खुर्चीत बसलोय त्या खुर्चीचं महत्त्व मला माहीत आहे. या खुर्चीत वैयक्तिक आवडनिवड ठेवून चालत नाही. जे जे माझ्या महाराष्ट्राच्या हिताचं, माताभगिनींच्या हिताचं आहे तेच करणार. त्यासाठी हट्ट न करता पाठपुरावा नक्कीच करणार. अजूनही वेळ गेलेली नाही. विकासाला थोडा वेळ लागला तरी चालेल, पण विकास हा त्याचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन झाला पाहिजे. तत्कालिक विकासाला काही अर्थ नसतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावले.
प्रकल्प म्हटला की त्याला विरोध येतो, पण त्यातून आपण मार्ग काढतो!
कोस्टल रोड हे मूळ आपलं स्वप्न. अनेक वर्षं त्याचे प्लान बनत होते. चर्चा करून करून त्याची मागील एक-दोन वर्षांत सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर कोळीबांधवांचा गैरसमज झाला, ते कोर्टात गेले. आपण आपली बाजू तिथे मांडली, त्यांना समजावलं. आता त्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. अशा गोष्टी होत असतात. मुंबई-पुणा रस्ता हे शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न, पण जाहीर केल्यानंतर त्यालाही विरोध झाला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जाहीर केल्यानंतर तिथेही शेतकऱयांनी विरोध केला होता. मी स्वतः तिथे गेलो होतो. माझ्यासोबत एकनाथ शिंदे मंत्री होते, संभाजीनगर, जालनाला भेट दिली होती. त्यातून आम्ही मार्ग काढला. एखादा प्रकल्प जाहीर झाल्यानंतर काहीजण त्याला विरोध करतात. त्यांची समजूत काढावी लागते. काही ठिकाणी तो थोडा बदलावा लागतो. जसजसा काळ बदलतो तशी त्याची व्याप्ती वाढते. नवनवीन तंत्रज्ञान येतं. ते आणावं लागतं. त्यानुसार प्रकल्पात बदल करावे लागतात, याची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
कांजुरच्या 40 हेक्टर गवताळ, ओसाड जागेवर मेट्रो कारशेड होत असेल, इथे होणाऱया जंक्शनवरून मेट्रो-14 ने थेट अंबरनाथ, बदलापूरला जाता येणार असेल तर यात मी काय चूक करतोय? तुम्हीच निर्णय द्या, हे जे आपण करतोय तो उपयोग आहे की अहंकार, मुख्यमंत्री म्हणून माझ्या जनतेसाठी, माझ्या राज्यासाठी पुढच्या 50 ते 100 वर्षांसाठी उपयुक्त राहील ते मी करणारच!
होय, मी विकास केला!
28 नोव्हेंबरला आपल्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्षं पूर्ण केलं आहे. अनेक जण हे सरकार आता पडेल, नंतर पडेल याकडे डोळे लावून बसले होते. मात्र आपल्या आशीर्वादाने, विश्वासाने एक वर्ष पूर्ण केलंच. ते करताना आरोग्यविषयक बिकट परिस्थिती जगभर निर्माण झाली तिचा सामना करत, राजकीय हल्ले परतवत, विकास करत एक वर्ष पूर्ण केलं आहे. होय, मी विकास नक्कीच केला आहे. जी विकासकामं सुरू आहेत त्याची पाहणी मी मागील काही दिवसांपासून सुरू केली आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यास नागपूरपासून सुरुवात केली. येत्या 1 मेपर्यंत समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा टप्पा आपण सुरू करीत आहोत. त्यानंतर सिंधुदुर्ग एअरपोर्ट, जो मागील 1 मे रोजी सुरू करणार होतो, पण कोरोनामुळे थांबलो. येत्या जानेवारी महिन्यात हा विमानतळ आपल्यासाठी सुरू करण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. तो आम्ही सुरू करणारच. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या अतिरिक्त लाइनचे कामही वेगाने सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
प्रतिष्ठेचा प्रश्न करणार असू तर आपण खुर्चीत बसायला लायक नाही!
आपण जनतेचे सेवक आहोत. ज्याप्रमाणे आपले माननीय पंतप्रधान स्वतःला प्रधानसेवक म्हणतात, त्याप्रमाणे जर ते स्वतःला सेवक म्हणत असतील तर आपण कोण आहोत? आपणसुद्धा जनतेचे सेवक आहोत, जे जनतेच्या हिताचं आपण करू शकतो. ते जर न करता आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न करणार असू तर आपण खुर्चीत बसायला लायक नाही, असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
वाद आहे म्हणून जागा सोडून द्यायची. मग वाद सोडवणार कोण? कोणाच्या घशात ही जागा जाणार, बिल्डरच्या? त्यापेक्षा एकत्र बसून वाद सोडवला तर… ही तुमची, माझी नाही, राज्याची, जनतेची जागा आहे. उद्या आम्ही नसू, तुम्ही नसाल पण जनता असेल. मग ही जनतेची जागा त्यांच्या उपयोगासाठी आपण आणू शकणार असू तर यावरून खेचाखेची का करायची? चला, एकत्र बसून सोडवू, जे काही आहे ते तुझं माझं न करता हा प्रश्न सोडवू.
मी कामाला स्थगिती देतोय की कामाची प्रगती बघतोय हे ठरवा!
विकास करीत असताना काहीजण म्हणताहेत की, विकासाच्या आड का येताय तुम्ही? कुठे आलोय आम्ही विकासाच्या आड? समृद्धी महामार्गाची काही दिवसांपूर्वी पाहणी केल्यानंतर मी मुंबईतील मेट्रोच्या कामाच्या प्रगतीची पाहणी करणार आहे. त्याआधी आपण मुंबईच्या कोस्टल रोडची पाहणी केली. काही जण म्हणतील, ही कामं आम्ही सुरू केली तीच ही कामं आहेत. आहेतच, पण एक काय तरी ठरवा. मी कामाला स्थगिती देतोय की कामाची प्रगती बघतोय. मी कामाची प्रगती बघतोय, त्याच्यावर स्वतः लक्ष ठेवतोय, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
सौजन्य- सामना