डॉ. जयंत नारळीकरांनी फक्त खगोलशास्त्रात मोठे कार्य केले नाही, तर सामान्य माणसाच्या मनातील गूढ, भिती आणि अज्ञान दूर करण्यासाठी विज्ञानाची विजेरी घेऊन अंधार भेदण्याचेही धाडस केले. म्हणून ते केवळ शास्त्रज्ञ नाहीत, ते समाजाचे विवेकशील मार्गदर्शक आहेत.
– – –
जगदीश काबरे
‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’, असे म्हणतात ते जयंत नारळीकर यांच्या बाबतीत काही खोटे नव्हते. जयंत नारळीकर लहानपणापासूनच अभ्यासू, शांत व समंजस स्वभावाचे होते. शालेय वयात त्यांना गणित व विज्ञानाची विशेष गोडी होती. त्यांचे वडील प्रा. विष्णु नारळीकर हे स्वतः गणितज्ञ असल्यामुळे घरात एक बौद्धिक वातावरण होतं. जयंत लहान असताना गणितातील प्रश्न सोडवताना पुस्तकांपेक्षा स्वतःच्या मार्गाने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असत. यामुळे त्यांचे आकलन आणि तार्किक क्षमता वाढत गेली. शालेय जीवनात त्यांना इंग्रजी, संस्कृत हे भाषा विषय चांगले वाटत, मात्र गणित व विज्ञानात त्यांचा दर्जा कायमच उत्कृष्ट होता. डॉ. नारळीकरांनी स्वतःच एका मुलाखतीत सांगितले होते की शालेय परीक्षेत मी गणितात नेहमीच १००पैकी १०० गुण मिळवत होतो, पण इतर विषयांत माझा टक्का नेहमी ७०–८०च्या आसपास राहायचा. त्यांना नेहमीच मूलगामी प्रश्न विचारण्याची आवड होती. ग्रह कसे फिरतात, पृथ्वीच्या बाहेर काय आहे, यांसारखे प्रश्न त्यांच्या बालमनात कायम असत. शालेय काळात आयझॅक न्यूटन आणि अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला होता. शालेय जीवनानंतर ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेले. तिथेही त्यांचे गणितातील ज्ञान आणि शंका विचारण्याची शैली सर्वांना आकर्षक वाटायची.
प्रा. विष्णु नारळीकर हे अत्यंत शिस्तप्रिय विद्वान गृहस्थ होते. त्यांनी जयंत यांच्यावर अभ्यासासाठी कधीही दबाव टाकला नाही, पण विज्ञान समजून घेण्याची पद्धत शिकवली. जयंत नारळीकर एका लेखात लिहितात, ‘माझे वडील मला उत्तर सांगायचे नाहीत, तर ते प्रश्न समजावून सांगायचे आणि मला विचार करायला भाग पाडायचे.’ अशी वैचारिक बैठक झाल्यामुळे शालेय जीवनात त्यांनी कधीही इतरांपेक्षा जास्त गुण मिळवावेत यासाठी अभ्यास केला नाही. त्यांच्या मते, ज्ञानाची ओढ आणि शुद्ध कुतूहल हे खरे शिक्षणाचे अधिष्ठान असते. त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण हिंदीतून झाले तरी त्यांना कुठल्याही न्यूनगंडाने ग्रासले नाही.
उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला गेल्यावर त्यांनी १९६३मध्ये पीएचडी प्राप्त केली. या काळात त्यांना स्मिथ पुरस्कार, अॅडम पुरस्कार आणि रँगलर ही पदवी तसेच खगोलशास्त्राचे टायसन पदक, असे अनेक सन्मान मिळाले. भारतात आल्यानंतर पद्मभूषण, पद्मविभूषण हे पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’, विज्ञानातील कामगिरीबद्दल शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार तसेच इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले. २०२१मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
डॉ. जयंत नारळीकर यांचा पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितीला अंतराळातून आलेले जीवाणू कारणीभूत आहेत का, याचा शोध घेणारा वैज्ञानिक प्रयोग प्रचंड गाजला.
‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिएरी’ अर्थात ‘स्थिर स्थिती सिद्धांत’ हे त्यांचे विज्ञानातील महत्त्वाचे योगदान. हा सिद्धांत ‘फ्रेड हॉएल-नारळीकर सिद्धांत’ म्हणून जगभर ओळखला जातो. त्यांच्या या दोन्ही सिद्धांतावर पारंपरिक वैज्ञानिक प्रवाहाच्या बाहेर जाऊन त्यांनी अनेक धाडसी कल्पना मांडल्या व त्यावर प्रयोगही केले. विसाव्या शतकाच्या मध्यात ब्रह्मांडाच्या उगमाविषयी दोन प्रमुख सिद्धांत चर्चेत होते – बिग बँग सिद्धांत आणि स्थिर-स्थिती सिद्धांत. बिग बँग सिद्धांतानुसार ब्रह्मांडाची सुरुवात एका अत्यंत घन व उष्ण बिंदूपासून झाली, आणि त्यानंतर त्याचा विस्तार झाला. तर स्थिर-स्थिती सिद्धांताने याला पूर्ण विरोध केला. प्रâेड हॉयल, थॉमस गोल्ड आणि हरमन बॉन्डी या तीन ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञांनी १९४८ साली स्थिर-स्थिती सिद्धांत मांडला. या सिद्धांताचे मुख्य गृहितक असे होते की ब्रह्मांडाचा विस्तार होत असतो, तरीही त्याचे एकंदर घनत्व व संरचना स्थिर राहतात. हे शक्य होण्यासाठी ब्रह्मांडात सतत नवीन वस्तुमान (हायड्रोजन अणू) तयार होत असते. या ब्रह्मांडाला ना आरंभबिंदू आहे ना शेवट. ते असीम आणि कालातीत आहे. त्यामुळे विश्वाचा उगम होण्यासाठी बिग बँगसारख्या स्फोटाची गरज नाही.
नारळीकर यांनी याच फ्रेड हॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली या सिद्धांतावर केंब्रिज विद्यापीठात संशोधन सुरू केले. त्यांनी क्रिएशन फील्ड (सी फील्ड) म्हणजे ‘निर्मिती क्षेत्र’ या नव्या कल्पनेचा उपयोग करून स्थिर-स्थिती सिद्धांताला अधिक सुसंगत व गणितीदृष्ट्या ठोस बनवले. त्यांची ब्रह्मांडातील वस्तुमान निर्मितीसाठी वापरलेली सी-फील्ड ही कल्पना आईन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षतावादाशी सुसंगत होती. तिचा वापर करून त्यांनी असे सिद्ध केले की, ब्रह्मांडात वस्तुमानाची निर्मिती अल्प प्रमाणात होत असते. यामुळे ब्रह्मांडाची एकूण घनता स्थिर राखली जाऊ शकते. पण १९७०च्या दशकानंतर कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंड रेडिएशनच्या (सीएमबीआर) शोधामुळे स्थिर-स्थिती सिद्धांताला मोठा धक्का बसला. या विकिरणाचे स्पष्टीकरण केवळ बिग बँग सिद्धांतच देऊ शकतो, असे वैज्ञानिकांना दिसले. परंतु, नारळीकरांनाr या सर्व पुराव्यांना पर्यायी स्पष्टीकरणे देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, या विकिरणांचे मूळ धुळीच्या ढगांमध्ये किंवा इंटर गॅलॅक्टिक प्लाझ्मामध्ये असू शकते. तरीही खगोलशास्त्र निरीक्षणाच्या पुरेशा पुराव्याअभावी अजूनही त्यांचा हा सिद्धांत पूर्णपणे स्वीकारले गेलेला नाही.
त्यांची दुसरी महत्त्वाची संकल्पना होती जीवनाचा ब्रह्मांडीय उगम. या संकल्पनेनुसार, जीवनाची सुरुवात पृथ्वीवर झाली नसून ते अंतराळातून आले असावे – विशेषतः उल्का, धूमकेतू किंवा धुळीच्या कणांतून. या संकल्पनेला हॉयल आणि चंद्र विक्रमसिंघे या ब्रिटिश वैज्ञानिकांनी आधुनिक स्वरूप दिले. नारळीकरांनी या दोन वैज्ञानिकांसोबत काम करत असताना भारतात या सिद्धांतावर प्रयोग सुरू केले. त्यासाठी त्यांनी हाय-अल्टिट्यूड बलून प्रयोग केला. १९९०च्या दशकात नारळीकरांनी इस्रोच्या सहकार्याने ४१ किमी उंचीवर स्थितांबरात (स्ट्रॅटोस्फियर) प्रयोग केले. त्यांनी या उंचीवरून धुळीचे व हवेचे नमुने गोळा करून त्यात जीवाणूंची उपस्थिती सिद्ध केली. हे सूक्ष्मजीव उष्णतेला आणि विकिरणाला सहन करणारे होते. ते पृथ्वीवरील सामान्य हवामानापेक्षा वेगळ्या परिस्थितीतही तग धरू शकणारे होते. काही वैज्ञानिकांच्या मते, तो पृथ्वीवरील दूषितीकरणाचा (कन्टॅमिनेशन) परिणाम असू शकतो. परंतु नारळीकरांचा दावा होता की, त्यांनी त्यांनी वापरलेली पद्धत दूषितीकरणापासून मुक्त होती आणि त्यामुळे हे जीव अंतराळातून आले असावेत.
ही संकल्पना अंतराळजीवशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या विश्वात जीवसृष्टी सर्वत्र आहे आणि सूक्ष्म जीवांचा वर्षाव पृथ्वीवर होत असतो. सूक्ष्मजीव अंतराळात तग धरण्याची शक्यता अन्य प्रयोगांद्वारेही सिद्ध झाली आहे. त्यामुळे जीवनाचा उगम ब्रह्मांडात सर्वत्र असण्याची संधी असते. पण हा सिद्धांत केवळ जीवन कुठून आले हे सांगतो, कसे तयार झाले हे नाही सांगत. तसेच पृथ्वीवरील दूषितीकरणापासून हे प्रयोग पूर्णतः मुक्त होते की नाही यावरही शंका घेण्यात आल्यामुळे मुख्य प्रवाहातील वैज्ञानिक समुदायाने या निष्कर्षांकडे साशंकतेने पाहिले.
यावरून आपल्या लक्षात येते की जयंत नारळीकर हे केवळ सैद्धांतिक संशोधक नव्हते, तर ते प्रयोगशील वैज्ञानिक होते. त्यांनी प्रचलित वैज्ञानिक विचारधारेला आव्हान दिले, परंतु हे आव्हान ‘आंधळेपणाने केलेला विरोध’ या प्रकारचे नव्हते; तर त्यांच्या कामात वैज्ञानिक चौकसपणा, निरीक्षण, आणि तार्किक आधार होता. त्यांच्या मते, विज्ञान हे स्थिर नसते, ते नेहमी बदलत राहते आणि प्रत्येक नवी संकल्पना ही वैज्ञानिक विश्वाच्या समृद्धीसाठी आवश्यक असते.
आज जग नारळीकरांना केवळ एक खगोलशास्त्रज्ञ म्हणून नव्हे, तर एक विचारशील वैज्ञानिक आणि विज्ञानप्रसारक म्हणूनही ओळखते. त्यांनी सिद्धांत, गणित, प्रयोग आणि विज्ञान तत्त्वज्ञान या सर्वांचा उत्तम समन्वय साधून विज्ञानाला नव्या दिशा दिल्या. आपण विज्ञानात केवळ उत्तरे शोधण्याची नव्हे, तर प्रश्न विचारण्याची गरज ओळखायला शिकले पाहिजे. हीच नारळीकरांच्या वैज्ञानिक विचारसरणीची खरी शिकवण आहे.
त्यांनी मराठी माणसासाठी केलेले आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे विज्ञान साहित्याला मराठी भाषेत सन्मान मिळवून दिला. त्याआधी मराठी साहित्यिकांनी विज्ञानाला साहित्य समजायलाच नकार दिला होता. पण त्यांनी लिहिलेल्या विज्ञान कथा, कादंबर्या आणि माहितीपर पुस्तकांमुळे देशातील अनेक तरुणांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यास मदत झाली. त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी लोक अभूतपूर्व गर्दी करायचे. बव्हंशी अंधश्रद्धाळू असलेल्या भारतात एखाद्या शास्त्रज्ञाला अशी लोकप्रियता मिळणे ही खरोखरच आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.
इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून १९७२ला भारतात आले. त्यांनी मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) खगोलशास्त्र विभागात प्रमुखपद स्वीकारले. त्यानंतर त्यांनी वैज्ञानिक संशोधनाबरोबरच पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्ससारख्या (आयुका) संस्थांच्या उभारणीत महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांमध्ये विज्ञानप्रसार करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या विज्ञान कथा, कादंबर्या आणि वैज्ञानिक माहिती लिहिलेली पुस्तके मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली. विज्ञानातील बुवाबाजीविरोधात त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यासाठी प्रसंगी काही जणांचा रोषही पत्करला. फलज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे किंवा फार तर त्याला समोरच्या माणसाच्या मनाचा ठाव घेत अंदाजपंचे केलेली भाकीते एवढेच महत्त्व द्यायला हवे, असे त्यांचे मत होते. भारतात हजारो वर्षांपासून ज्योतिषशास्त्र म्हणजेच ग्रह, नक्षत्रे, जन्मकुंडली, योग-दोष यावर आधारित भविष्यवाणीला एक विशेष स्थान आहे. लग्न, वास्तु, नवस, अपत्यप्राप्ती, शिक्षण, व्यवसाय यांमध्येही लोक अनेकदा ज्योतिषाचा आधार घेतात. पण, डॉ. नारळीकर यांच्या मते हे क्षेत्र शास्त्रीय चाचणीस पात्र नाही, आणि त्यामुळे ते ‘शास्त्र’ म्हणून ग्राह्य धरता येत नाही. विज्ञान हे निरीक्षण, प्रयोग आणि सत्यता पडताळून पाहण्यावर आधारित असते. पण ज्योतिषशास्त्रात भविष्यवाण्या बहुतेक वेळा अस्पष्ट, गोंधळवून टाकणार्या आणि सत्यापासून दूर असतात. ज्योतिषातील ग्रहांच्या स्थितीचा आपल्या जीवनावर प्रभाव आहे, हे प्रायोगिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. त्यातील मोजण्या, गणिते, किंवा कुंडल्या तयार करताना मानवी जन्माच्या क्षणाची अचूक वेळ आणि स्थान यावर इतकी अवलंबून असते की त्यात सहज चुका होतात. कारण व्यक्तीचा जन्मकाळ अचूकपणे ठरवणे हीच एक अशक्यप्राय गोष्ट आहे. गर्भातील जीवन, प्रसूतीपूर्व विकास, जन्मावेळेची अस्पष्टता या सार्या गोष्टी ज्योतिषशास्त्राला अमान्य असतात. मग त्यावर आधारित कुंडली म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने अतार्किक भाकितच.
डॉ. नारळीकर आणि त्यांच्या सहकार्यांनी ज्योतिषशास्त्राच्या वैधतेची प्रयोगशाळेत चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या प्रयोगात १०० मुलांच्या जन्मकुंडल्या ५० ज्योतिष्यांपुढे ठेवल्या गेल्या. त्यांना त्या कुंडल्या पाहून मुलांचे शारीरिक, बौद्धिक व सामाजिक आरोग्य कसे आहे हे सांगण्यास सांगितले. ज्योतिषांचे अंदाज चुकण्याची शक्यता ‘अपघाताने’ बरोबर होण्याइतकीच होती. म्हणजे आपण छापा काटा करताना ५० टक्के खरे आणि ५० टक्के खोटे असे उत्तर येण्याचा संभव असतो, त्या पद्धतीने ज्योतिषांची भाकीते असतात. हा प्रयोग ज्योतिषशास्त्राच्या थोतांडावर प्रकाशझोत टाकणाराच होता.
ज्योतिषाविरोधी भूमिकेबरोबरच डॉ. नारळीकरांनी अंधश्रद्धांविरुद्धही वैचारिक पातळीवर संघर्ष केला आणि वेळोवेळी समाजाला सजग केले. त्यांनी नवस, वास्तुशास्त्र, ग्रहपीडा निवारण, रत्नधारण यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रबोधन केले. शालेय शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा म्हणून सामान्य माणसाला विज्ञान समजेल अशा सोप्या भाषेत व्याख्याने दिली. लेख लिहिले. डॉ. नारळीकर फक्त टीका करत बसले नाहीत, तर त्यांनी शास्त्र, तथ्य आणि तार्किक विचारांची लोकांमध्ये पेरणी केली. त्यांचे असे धोरण होते की अंधश्रद्धेचा मुकाबला रागाने नव्हे, तर विचाराने करायला हवा. तरुणांना प्रश्न विचारण्याची सवय लावायला हवी. विज्ञान हे कोरडे आणि रुक्ष नसून विचारांच्या कक्षा रुंदावणारे आहे, हे पटवून द्यायला हवे. विज्ञानाचा गाभा संशय, परीक्षण, आणि सत्याचा शोध यात आहे, हे लोकांनी ओळखायला शिकायला हवे.
सामाजिक भान सदैव जागृत असलेल्या जयंत नारळीकर यांची देव, धर्म आणि अंधश्रद्धा याविषयी अत्यंत स्पष्ट मते होती आणि ही मते नेहमी ते व्याख्यानातून आपल्या मृदू भाषेत पण ठामपणे मांडत. ते म्हणत…
१. देव या संकल्पनेवर माझा विश्वास नाही.
२. विज्ञानात प्रश्न विचारणं महत्त्वाचं असतं. धर्मात प्रश्न विचारायची मुभा नसते.
३. आपण आपल्या बुद्धीचा वापर न करता काही गोष्टी केवळ परंपरेने करत असतो. हे चुकीचं आहे.
४. मी विज्ञानप्रसारासाठी लिहितो कारण मला वाटतं की समाजात अंधश्रद्धा खूप आहे.
५. धर्म म्हणजे माणसाच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं एक साधन आहे.
अशा स्पष्टवत्तäया पण मृदूभाषी असलेल्या भारताचा नावलौकिक जगभरात पोहोचवणार्या जयंत नारळीकरांनी निर्माण केलेली विज्ञान यात्रा त्यांच्या निधनानंतरही वारीसारखी पुढे चालत रहाणार आहे. त्यांच्या तीनही कन्या या शास्त्रज्ञ असून नारळीकर घराण्याचा विज्ञानाच्या प्रगतीचा वारसा पुढे नेत आहेत. त्यांनी फक्त खगोलशास्त्रात मोठे कार्य केले नाही, तर सामान्य माणसाच्या मनातील गूढ, भिती आणि अज्ञान दूर करण्यासाठी विज्ञानाची विजेरी घेऊन अंधार भेदण्याचेही धाडस केले. त्यांनी दाखवून दिले की विज्ञान हे केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित नसून ते जीवन जगण्याची एक समजूतदार पद्धत आहे. म्हणून डॉ. जयंत नारळीकर हे केवळ शास्त्रज्ञ नाहीत, ते समाजाचे विवेकशील मार्गदर्शक आहेत. त्यांच्या लेखनातून, भाषणातून आणि प्रयोगातून आजही नव्या पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रश्न विचारण्याची सवय आणि सत्यशोधनाची प्रेरणा मिळते.
त्यांचा जन्मदिवस १९ जुलै हा ‘राष्ट्रीय विज्ञानकथा दिन’ म्हणून संपन्न होत असतो.. देशात प्रत्येक पिढीत वैज्ञानिक निर्माण होत रहावेत, देशाची वैज्ञानिक क्षेत्रात प्रगतीची कायम घोडदौड व्हावी या असोशीपोटी जन्मभर कार्यरत राहणार्या या महान खगोलशास्त्रज्ञाचे वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगणारा समाज निर्माण करण्याचे ध्येय होते. त्या ध्येयाला अनुसरून जर आपण प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगायचे ठरवले तर ती त्यांना खर्या अर्थाने वाहिलेली आदरांजली असेल.