‘आयपीएल’च्या १८व्या हंगामाला २२ मार्चपासून झोकात प्रारंभ होतोय. ‘जिथे गुणवत्तेला संधी मिळते’ हे ‘आयपीएल’चं ब्रीदवाक्य. पण, ‘आयपीएल’मध्ये खेळणार्या क्रिकेटपटूंच्या पल्याड खेळ असतो, तो पैशांचा. ‘आयपीएल’च्या या अर्थकारणाचा घेतलेला वेध.
– – –
उन्हाच्या झळा तीव्रतेनं जाणवू लागल्यायत… डोनाल्ड ट्रम्पच्या ‘टेरिफनीती’मुळे देशातले शेअर बाजार गटांगळ्या खातायत… तमिळनाडूनं आपली अस्मिता जपण्यासाठी रुपयाचं नवं चिन्हं अमलात आणलंय… चॅम्पियन्स करंडकाचं यजमानपद आपलं; पण कमाईचे सामने गेले दुबईत, संघ साखळीतच गारद झाला आणि जेतेपदही भारतानं पटकावलं, मग आपण नेमकं काय कमावलं, याचा शोध पाकिस्तान क्रिकेट मंडळ घेतंय… साठीचा आमीर खान तिसर्यांदा बोहल्यावर चढण्याची तयारी करतोय… अशा अनेक घटनांचं चर्वितचर्वण देशात सुरू असताना शनिवारपासून दररोज पुढील दोन महिने रमविणारा क्रिकेट उत्सव सुरू होतोय…
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १८व्या हंगामासाठी आपण सज्ज झालोय. त्यामुळे, हॅरी ब्रुक्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आलीय, जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे काही सामने खेळू शकणार नाही, अक्षर पटेलकडे दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व सोपवण्यात आलंय अशा असंख्य बातम्या येऊन धडकतायत. पण, ‘आयपीएल’ म्हणजे प्रâँचायझी क्रिकेट. पण, क्रिकेटच्या पलीकडे कित्येक पटीनं इथे पैसा खेळतो. त्याचं अर्थकारण ११ अब्ज डॉलर्सचं असं हेवा वाटणारं. ‘आयपीएल’ हा एक देश असता तर त्याचं सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) जागतिक क्रमवारीत १६०व्या क्रमांकाचं ठरलं असतं. भूतान, मालटा, मालदीव अशा काही देशांशी बरोबरी साधणारं. परंतु २००८पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.
भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा झारखंडचा महान क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी चेन्नईचा लाडका ‘थाला’ हे बिरूद मिरवतोय. दुखापती आणि ४३ वर्षे वयाची तमा न बाळगता तो खेळतोय. त्याचं यष्टीरक्षण जुन्या मद्याप्रमाणं उत्तरोत्तर अधिक आकर्षक ठरतंय. त्यानं शेवटच्या काही षटकांमध्ये मैदानावर उतरावं आणि फटकेबाजीनं जिंकावं, ही केवळ चेन्नई सुपर किंग्जच्या पिवळ्या महासागराची नव्हे, तर सर्वच क्रिकेटरसिकांची अपेक्षा आजही जपली जातेय. या तमिळ येलो आर्मीचं नेतृत्व करतोय, एक मराठी माणूस ऋतुराज गायकवाड.
‘ई साला कप नमदे’ (या वर्षी चषक आमचाच) ही रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. पण दिल्लीकर विराट कोहलीचा खेळ पाहण्यासाठी गर्दी होतेय. त्यांचा कर्णधार आहे, मध्य प्रदेशचा रजत पाटीदार. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या देशातील महत्त्वाच्या शहरांच्या संघांचं नेतृत्व अनुक्रमे हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल हे गुजराती बांधव करतायत. पण, ‘मुंबईचा राजा’ रोहित शर्माची हवाई फटकेबाजी पाहणं आनंददायी असतं. त्यामुळे ‘आयपीएल’ राज्यांची भाषा, धर्म, जात, संस्कृती, आदी भेदाभेदाच्या सीमा ओलांडतंय. विविधतेतून एकता साधण्याचं कार्यच जणू ही अब्जावधी रकमेची लीग साकारतेय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
धोनी, विराट, रोहित ही सारी मैदानावर गर्दी आणि दूरचित्रवाणी-डिजिटल माध्यमांसाठी दर्शकसंख्या खेचणारी मंडळी. याशिवाय लिलाव प्रक्रियेत सर्वाधिक २७ कोटी रुपयांची बोली लागलेला ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर, मिचेल स्टार्क, जोस बटलर, आदी काही क्रिकेटपटूसुद्धा चाहत्यांना आवडतात. २००८मध्ये ‘आयपीएल’च्या पहिल्या लिलावासाठी १४५.७ कोटी रुपये संघांनी गुंतवले. २०२५च्या लिलावासाठी हा आकडा चार पटीहून अधिक उंचावत ६३९.१५ कोटी रुपये गुंतवले गेले. ही गुंतवणूक मागील वर्षीपेक्षा १७७ टक्के अधिक आहे. ‘आयपीएल’चे संघ सहभागासाठी कोट्यवधी रुपये गुंतवतात; पण त्यांना नफ्यातला वाटा मिळतो १,०४५ कोटी रुपये तर विजेता संघ कमावतो फक्त २० कोटी रुपये.
‘आयपीएल’ची सर्वात जास्त कमाई प्रक्षेपण हक्कांद्वारे होते. २०२३ ते २०२७पर्यंत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाचे हक्क स्टार स्पोर्ट्सनं मिळवले, तर डिजिटल हक्क व्हायकॉम-१८ म्हणजेच रिलायन्सनं प्राप्त केले. मोफत क्रिकेटचं गाजर दाखवून चाहत्यांना मोहात पाडल्यानंतर रिलायन्सनं स्टार स्पोर्ट्सवर पूर्णत: ताबा मिळवला. त्यामुळे यंदाचं ‘आयपीएल’ जिओस्टार एकीकरण कंपनीकडून दोन्ही माध्यमांमध्ये दाखवले जाईल. या पाच वर्षांसाठी ४८,३९० कोटी रुपये एवढी विक्रमी गुंतवणूक आधीच झालीय. मागील पाच वर्षांच्या (२०१८-२२) तुलनेत ही १९६ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्यावेळी स्टार स्पोर्ट्सने दूरचित्रवाणी आणि डिजिटल हक्क मिळवण्यासाठी १६,३४७.५ कोटी रुपये मोजले होते. यापैकी ५० टक्के नफा फ्रंचायझींकडे जातो, तर उर्वरित ५० टक्के नफा ‘बीसीसीआय’कडे. गतवर्षीच्या ‘आयपीएल’ला डिजिटल प्रेक्षकसंख्या ६२ कोटीपर्यंत (२०२३-४४.९ कोटी) उंचावली. मोफत क्रिकेट प्रक्षेपण ही जिओ सिनेमाची योजना यशस्वी ठरली आणि जिओ मोबाईल सेवेच्या ग्राहकांच्या संख्येतही भर पडली. दूरचित्रवाणीवरील प्रेक्षकसंख्या मात्र किंचितच वाढली. ही २०२३मध्ये ५०.५ कोटी होती, तर २०२४ला ५१ कोटी झाली.
इतकंच कशाला? ‘आयपीएल’च्या प्रत्येक सामन्याचं मूल्य हे दुसर्या क्रमांकाच्या इंग्लिश प्रीमियर लीगलाही मागे टाकते. या आकडेवारीत फक्त अमेरिकेतील नॅशनल फुटबॉल लीग (एनएफएल) आयपीएलपुढे अग्रेसर आहे.
जाहिरातीद्वारे मिळणारं उत्पन्न हे ‘आयपीएल’साठीचं महत्त्वाचं अर्थमाध्यम. यंदाच्या हंगामात दूरचित्रवाणी, डिजिटल माध्यम, संघाचे पुरस्कर्ते आणि मैदानावरील जाहिराती याद्वारे मोठ्या उलाढाली होण्याची शक्यता आहे. जिओस्टार या प्रक्षेपण कंपनीनंही यावेळी सहा ते सात हजार कोटी रुपयांचं लक्ष्य निर्धारित केलं आहे. १२ बड्या जाहिरात कंपन्या त्यांच्या यादीत एव्हाना सामीलही झाल्यायत. गतवर्षी स्टार आणि जिओनं एकत्रितपणे चार हजार कोटी रुपये कमावले होते. यावेळी जाहिरात दरात ९-१५ टक्के वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे. म्हणजेच १० सेकंदांच्या जाहिरातीसाठी १८-१९ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. जिओमध्ये स्टार विलीन झाल्यामुळे आणि भारतीय प्रक्षेपण बाजारपेठेत आव्हान देऊ शकेल असा खंदा प्रतिस्पर्धी नाही, हेच जिओस्टारच्या एकाधिकारशाहीचं प्रतीक आहे.
गेल्या वर्षी ‘आयपीएल’ हंगामादरम्यानच सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा आल्यामुळे जाहिरातदारांनी हात आखडता घेतला होता. १० ‘आयपीएल’ संघांनाडआता प्रायोजकत्वाद्वारे एकूण १,३०० कोटी रुपये अपेक्षित आहेत. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्ससारखे लोकप्रिय संघ यात धडाका लावण्याची शक्यता आहे.
२०२४ ते २०२८ ही पाच वर्षं टाटा ‘आयपीएल’ अशीच लीगची ओळख असेल. कारण मुख्य प्रायोजकत्व. टाटानं हे हक्क २,५०० कोटी रुपयांची विक्रमी बोली लावत प्राप्त केलेत. याशिवाय ड्रीम इलेव्हन, पेटीएम, क्रेड, इत्यादी सहप्रायोजक आहेत. यानिमित्तानं परदेशी कंपन्यांची होणारी गुंतवणूक देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देते. मैदानावरील तिकीटविक्रीचा ८० टक्के लाभ यजमान संघांना होतो. यात ‘बीसीसीआय’चा वाटा अत्यंत कमी असतो. ‘आयपीएल’च्या काळात सर्वसामान्य क्रिकेटरसिकसुद्धा ‘फँटसी गेमिंग’मध्ये गुंतवणूक करून मोठी कमाईची स्वप्नं उराशी बाळगतात. गतवर्षी या क्षेत्रातील कंपन्यांनी ५१ कोटी डॉलरची कमाई केल्याचे सिद्ध होते. या आकडेवारीत आधीच्या वर्षीच्या तुलनेत २७ टक्के वाढ झाली आहे. याचप्रमाणे ‘आयपीएल’च्या संयोजनासाठी अंदाजे ५० हजार जणांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होते.
‘जिथे गुणवत्तेला संधी मिळते’ हे ‘आयपीएल’चं ब्रीदवाक्य गेली १८ वर्षं सार्थकी ठरतंय. अनेक गुणी खेळाडू या व्यासपीठावर उदयास आलेत. जागतिक क्रिकेटमध्ये देशोदेशीच्या लीगचं मोठ्या प्रमाणात पीक आलंय. पण ‘आयपीएल’ या यादी अग्रस्थानी आहे. ‘आयपीएल’ ही फक्त भारतातली एक वार्षिक लीग नसून, क्रीडा, पर्यटन, जाहिराती, आदरातिथ्य, डिजिटल माध्यमं, आदी अनेक उद्योगांना चालना देणारं एक अर्थपर्व आहे.
ताजा कलम : ‘आयपीएल’च्या मोठेपणाला आव्हान देण्याची योजना सौदी अरेबियानं आखलीय. ग्रँड स्लॅम ट्वेन्टी-२० क्रिकेट लीगच्या निमित्तानं वर्षातून चार वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटूंना एकत्रित खेळवण्याची योजना आहे. याकरिता सौदीतील एसआरजे स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंटनं ४,३४७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी केलीय. अर्थात, ‘आयसीसी’च्या मान्यतेची त्यांना प्रतीक्षा आहे.