• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

हुंडाविरोधी चळवळीचा पाया

- सचिन परब (प्रबोधन १००)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 5, 2023
in प्रबोधन १००
0

प्रबोधनकारांचा स्वाध्यायाश्रम आणि प्रबोधनकारांचाच `प्रबोधन` यांनी हातात हात घालून चालवलेली हुंडाबंदीची चळवळ ही प्रबोधनकारांच्या चरित्रातला एक महत्त्वाचा टप्पा. प्रबोधनकारांनी या चळवळीचं आघाडीवर राहून नेतृत्व केलं.
– – –

`प्रबोधन`च्या चौथ्या म्हणजे १ डिसेंबर १९२१च्या अंकात अंधेरीच्या द्वारकानाथ मार्तंड देशमुख यांचं `लग्नसराई आली!` या मथळ्याचं एक पत्र छापून आलं. त्यात त्यांनी तरुणांना हुंडा घेऊन झालेल्या लग्नांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं होतं. अत्यंत प्रभावी अशा या पत्रात लिहिलं होतं, `सोप्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे यंदाच हुंड्यावर कडकडीत बहिष्कार पडला पाहिजे. यासाठी तुमच्या जवळही एक उपाय आहे. तो हाच की, जे लग्न मग ते प्रत्यक्ष भावाचे असो, हुंडा घेऊन झाले असेल त्या लग्नास तुम्ही मुळीच हजर राहूं नका! पहा काय मौज होते ती! अशा लग्नाचे समारंभ स्मशानयात्रेसारखे सुने वाटतील! दुष्ट रूढीचा नायनाट झालाच पाहिजे!`
स्त्रियांवरच्या अन्याय-अत्याचारांच्या विरोधात प्रबोधनकारांची वाणी आणि लेखणी अगदी सुरुवातीच्या काळापासून आसूड ओढल्यासारखी त्वेषाने उसळून येत असे. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी पनवेलमध्ये जरठबाला विवाहाचा मंडप पेटवला होता. स्वतःच्या लग्नातही त्यांनी स्त्री सन्मानाचं आदर्श उदाहरण घालून दिलं होतं. तेव्हा त्यांनी ना हुंडा घेतला होता, ना त्यांनी मुलगी बघायचा कार्यक्रम केला होता आणि ना कन्यादान होऊ दिलं होतं. त्यानंतर हिंदू मिशनरी सोसायटीच्या वैदिक लग्नांच्या प्रसारातून त्यांनी लग्नांमधल्या हुंड्याला आणि खर्चाला अप्रत्यक्ष आळा घालण्याचा आग्रह केला होता.
या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या १९१९मध्ये प्रकाशित झालेल्या `कुमारिकांचे शाप` या पुस्तकात आढळतं. तेव्हा कोलकात्यातल्या स्नेहलता नावाच्या १५ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली होती. तिच्या हुंड्यासाठी वडील वडिलोपार्जित घर विकण्याची तयारी करत असल्याचं बघून तिने हा टोकाचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली होती. त्यानिमित्ताने प्रबोधनकारांनी दादरमध्ये हुंड्याविरुद्ध जोरदार भाषण केलं होतं. ते पुस्तिकेच्या रूपाने प्रसिद्ध झालं होतं. वाटल्यास अविवाहित राहा, पण हुंडा देऊ नये, असं बंडखोर आवाहन प्रबोधनकारांनी मुलींना केलं होतं. सीकेपी समाजाच्या परिषदांमध्ये पत्रकं वाटून तसंच समाजासाठी प्रसिद्ध होणार्‍या पत्रिकांमध्ये त्यांनी हुंडाविरोधी जागृती `प्रबोधन`च्या आधीपासून केली होतीच.
`प्रबोधन`मधल्या द्वारकानाथ देशमुखांच्या पत्रामुळे हुंडाविरोधी चळवळीला नव्याने चालना मिळाली. या पत्राला प्रतिसाद म्हणून हुंड्याचा निषेध करणारी पत्रं आणि लेख `प्रबोधन`च्या कचेरीत जमा झाले. त्यातली विवाहविधीची सुधारणा करण्याची गरज सांगणारं यशवंत गुप्ते यांचं तसंच आताच्या सांगली जिल्ह्यातल्या बागणी गावचे प्रसिद्ध सत्यशोधक कृ. भा. बाबर यांचं अशी दोनच पत्रं नवे मुद्दे मांडणारी असल्याचं प्रबोधनकारांनी नोंदवलेलं आहे. त्यांनी बाबरांचं पत्रही १ जानेवारी १९२३च्या अंकात प्रसिद्ध केलं आहे.
हुंडा घेणार्‍यांवर बहिष्कार घालण्याचा देशमुखांच्या पत्रातला उपाय प्रबोधनकारांनीही योग्य ठरवला आहे. ते लिहितात, `आता लेख खरडण्याचे व व्याख्याने देण्याचे दिवस उरलेले नाहीत. साधक बाधक प्रमाणांच्या किसण्या अतःपर लाथाडून टाकल्या पाहिजेत. नवीन युगांतरांत पोटच्या पोरांचा विक्रय करणारे नराधम समाजांतून आमूलाग्र उखडून टाकले पाहिजेत.`
तिथे इंदूरमधल्या सीकेपी तरुणांनी `प्रबोधन`मधल्या लेखनापासून प्रेरणा घेऊन हुंडेबाज लग्नांवर बहिष्कार टाकण्याचं पाऊल उचललं. प्रबोधनकारांच्या याविषयीच्या टिपणातून त्याची माहिती समोर येते. इंदूरच्या सुळे नावाच्या एका वरपित्याने गडकरी नावाच्या वधूपित्याकडून पाचशे रुपये हुंडा घेतला. तरुणांना हे कळताच रामचंद्र गडकरी (प्रबोधनकारांच्या वडिलांचे मामेभाऊ), म. के. कर्णिक अशा तरुणांनी एकत्र येऊन त्याचा निषेध नोंदवायला सुरुवात केली. वरपित्याला हुंडा परत देण्याचं नम्रपणे आवाहन केलं. पण वरपिता ऐकतच नाही, हे बघून चर्चेत वेळ न घालवता समाजाची बैठक घेतली. १९ डिसेंबर १९२२ला वकील केशवराव कर्णिक यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत समाजाच्या २८ प्रमुख सभासदांनी सही केलेली शपथपत्रिका छापली आणि शहरभर वाटली. प्रबोधनकारांनी ही पत्रिकाही `प्रबोधन`मध्ये छापली आहे. त्यानुसार या सभासदांनी आपण कुणीच हुंडेवाल्या लग्नात सहभागी होणार नसल्याची शपथ घेतली आहे.
त्याचा योग्य तो परिणाम झालाच. प्रबोधनकारांनी तोही नोंदवला आहे, `वधूवरांच्या लग्नगृहांना कडकडीत बहिष्कार पडून लग्नाला, भोजनाला किंवा वरातीला कोणीही इसम गेला नाही. आणि `अशा लग्नांचे समारंभ स्मशानयात्रेसारखे सुने वाटतील,` हा श्री. देशमुख यांचा उद्गार तेथे अक्षरशः अनुभवास आला. आमची इंदोरकर मंडळींना अशी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी या बहिष्कारशस्त्राचा प्रयोग चालू असलेल्या लग्नसराईत मोठ्या नेटाने, धैर्याने, शिस्तीने व शांतपणाने पुढे चालवून या समाजविध्वंसक हुंड्याला कायमची मूठमाती देण्याचें उदाहरण सर्व हिंदुसमाजाला घालून देण्याचा मान पटकवावा.`
१५ जानेवारीच्या `प्रबोधन`च्या अंकात आपल्याला कळतं की इंदूरमधल्या हुंडाविरोधी चळवळीत सक्रिय असणार्‍या तरुणांच्या व्िारोधात अब्रुनुकसानीचा दावा करण्याची तयारी सुरू झाली होती. त्यासाठी हुंडेबाजांनी एका एलएलबी झालेल्या वकिलाला हाताशी धरलं होतं आणि तो या चळवळीतल्या तरुणांना कायदेशीर कारवाईच्या धमक्या देत होता. या वकिलाला प्रबोधनकारांनी आपल्या लेखणीतून खणखणीत उत्तरही दिलं आहे. ते लिहितात, `सध्या तुरुंगांची पर्वा न करणारी जनता जेथे कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम मायबाप सरकारला सहज लीलेने बगलेत मारीत आहे, तिथे तुम्हा वकील कस्पटांच्या समन्स वारंटांच्या धमक्यांवर तिरस्काराने थुंकण्यासही तरूणजनांस फुरसद किंवा इच्छा नाही, हे आमच्या एलेल्बी शहाण्याने पूर्ण लक्षात ठेवावे… वकीलसाहेब, पोटांत रिचविलेल्या बुंदीच्या क्रियाकर्मांतराच्या नादी लागाल, तर जगांत आपली छी थू करून घ्याल. वकील, वेश्या व वैदू या तीन वकारांना तरूणपिढी पूर्ण जाणून आहे. उगाच मरत्या कोंबड्यांचा तडफडाट दाखवितां कोणाला?`
या काळात `प्रबोधन`मध्ये अनेक विचारप्रवर्तक लेख छापून येत होते. प्रबोधनकारांनी लिहिलेली `मानसिक दास्याविरुद्ध बंड` ही अग्रलेख मालिका गाजत होती. विवेकवादाची ओळख करून देणारे लेख प्रकाशित होत होते. विवाहविधीच्या संशोधनाची गरज सांगणारे प्रबोधनकारांचेच लेख चर्चेचा विषय बनले होते. विचारवंत गो. मं. चिपळूणकर यांनी `वराच्या हुंड्यांत वधूची उन्नती` या लेखात हुंडाप्रथेला आळा घालण्यासाठी काही उपाय सुचवले होते. इंडियन रॅशनलिस्टिक सोसायटीच्या मासिकात छापून आलेला आर. सी. मॉलिक यांचा `स्त्रियांचा सामाजिक दर्जा` या लेखाचा मराठी अनुवादही काही भागांत प्रसिद्ध केला होता. हुंडा न घेता होत असलेल्या लग्नांचं कौतुक करणारी तसंच हुंडा घेऊन झालेल्या लग्नाचा निषेध करणारी पत्रंही प्रकाशित होत होती. १६ मे १९२३च्या अंकात प्रबोधनकारांनी `हुंडेबाजांवर बहिष्कार कसा घालावा` या शीर्षकाचं एक स्फुट लिहिलंय. त्यात महिलांनीच हुंड्याच्या विरोधात प्रतिकार करण्याची प्रणिपातपूर्वक याचना केली आहे.
त्यात वरताण झाली ती `हुंडेबाज शायलॉकांची जंत्री` छापायला सुरवात केल्यापासून. यात कोणी लग्नात किती हुंडा घेतला याची नावानिशी यादीच छापली जाऊ लागली. त्याला प्रबोधनकारांच्या तिरकस शैलीची फोडणीही असे. उदाहरणार्थ- `हुंडेबाज हुंडेश्री मोरेश्वर भाऊराव खोपकर उर्फ चंदुलाल (दादर). धंदा नोकरीचा. वडिलांनी ८०० रुपयास विकले. हे तरूण सार्वजनिक कामाचे मोठे हावरे आहेत. त्यांचा विवाह होण्यापूर्वी हुंड्याविरुद्ध आपल्या मित्रमंडळींबरोबर पोटभर वादविवाद ते करीत असत. पण वेळ येताच या वाचाळ तरुणाची मजल आठशे रुपयावरच न थांबता १० वर्षांच्या शेंबड्या पोराप्रमाणे चार तोळ्यांच्या सोन्याच्या गोफासाठी रुसण्यापर्यंत गेली. दिग्विजयाची पूर्वचिन्हेच ही!`
पण १ जुलैच्या अंकात या याद्या छापण्याची पद्धत बंद करण्याची घोषणा केली आहे. त्याचं कारण सांगताना प्रबोधनकार लिहितात, `कारण एवढेच की हुंडानिषेधाचे ठराव एकमताने पास करणार्‍या या वाचाळ कायस्थ समाजाने यंदाच्या वर्षी शायलॉकगिरीची अगदी शिकस्त करून सोडली असून आमच्याजवळ दीडदोनशे हुंडेबाजांची यादी येऊन धडकली आहे व आणखी दररोज त्यात भर पडत आहे. अर्थात हातीच्या प्रातिनिधिक परिषदेशी क्रियानष्ट होणार्‍या या शहाण्यांची नावे छापण्याइतकी जागा आमच्याजवळ नाही. जेथे खुद्द परिषदेचे अध्यक्षच हुंड्याऐवजी चार हजारांचे मुलीच्या अंगावर दागिने मागण्याइतके कायदेबाज श्रीमंत बनले, तेथे २१०० आणि २२०० हुंडे हबकणार्‍या हुंडेबाजांनी आपल्या पुरुषपणाच्या लिलावाचे धांडगधिंगे का घालू नयेत? शिवाय जेथे पुढारी म्हणून मिरविणार्‍या धेंडांच्या दांतखिळ्या बसलेल्या आहेत, तेथे आमच्यासारख्या समाजअमान्य गोमाजीने तत्त्वासाठी दातकिरकिर्‍या करण्यात अर्थच उरला नाही.`
प्रबोधनकार इथे स्वतःला समाजअमान्य गोमाजी म्हणवून घेत असले, तरी तसं प्रत्यक्षात दिसत नाही. सीकेपी समाजाच्या संस्थांचं कोणतंही पद त्यांच्याकडे नसलं तरी त्यांच्या लिखाणाचा प्रभाव प्रचंड होता. त्याचं प्रत्यंतर लवकरच हुंडाविरोधी चळवळीत आलं. प्रबोधनकारांनी गणित मांडून दाखवून दिलं की सीकेपी समाजात १९२२च्या लग्नसराईत एकूण अंदाजे एक लाख रुपये हुंडा घेतला गेला. पोटच्या पोरांच्या व्यापाराचे हे आकडे समोर टाकत त्यांनी सीकेपी समाजाचा र्‍हास होत असल्याचा दावा केला. समाजबांधवांच्या मदतीसाठी मात्र निधी जमा होत नसल्याचं सत्यही त्यांनी आरसा म्हणून दाखवलं. `अरेरे, तुमची अंतःकरणे जर माणसांची असती तर हुंडेबाजीचा असा धुमाकूळ न घालता आपल्या भावाबहिणीच्या सहाय्यार्थ तुमही खास धावला असता. अनाथ विधवांचा आक्रोश, पोरक्या मुलांच्या किंकाळ्या, विपन्नग्रस्त उमेदवारांचे उसासे आणि कुमारिकांचे शाप ज्या समाजात रात्रंदिवस चालू आहेत, त्या समाजाची उन्नती होणे कदापि शक्य नाही.` प्रबोधनकारांचे असे शब्द वाचून सीकेपी समाजातले तरुण पेटून उठले नसते तरच नवल. त्यातून दादरमधल्या तरुणांनी `हुंडा विध्वंसक संघ` म्हणजेच `अँटी हुंडा लीग`ची स्थापना झाली. त्याचं नेतृत्व प्रबोधनकारांच्या हाती होतं. `प्रबोधन`मधल्या लिखाणाने या संस्थेचा पाया उभारला होता.

Previous Post

बारसू पाकिस्तानात आहे काय?

Next Post

रामाच्या अयोध्येत रावणाचे राज्य!

Next Post
रामाच्या अयोध्येत रावणाचे राज्य!

रामाच्या अयोध्येत रावणाचे राज्य!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.